Prakash Ambedkar: ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले राज्य सरकार किती काळ टिकणार

0

हिंगोली,दि.१५: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राज्य सरकार किती काळ टिकणार हे सांगितले आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यापासून भारतीय जनता पार्टी हे सरकार सत्तेत जास्त काळ राहणार नसून पडणार असल्याचे वारंवार सांगत आहे. केंद्रीयमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनीही राज्य सरकार पडणार असल्याचे वारंवार सांगितले होते. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्ष सरकार पाच वर्षाचा कालावधी पूर्ण करेल असे सांगत आहेत. हिंगोलीच्या औंढा नागनाथमध्ये वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ओबीसी शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात बोलताना आंबेडकरांनी सरकारचा त्यांच्या दृष्टीने करेक्ट टायमिंग सांगितला. रडत पडत का होईना, माऱ्यामाऱ्या करत का होईना, पण ठाकरे सरकार पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा अंदाज आंबेडकरांनी व्यक्त केला.

हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ शहरामध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत दोन दिवसीय ओबीसी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. औंढा येथे असेलेल्या भक्त निवास मध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्य सरकारवरही टीकास्त्र सोडलं. सरकारमधील मंत्र्यांचा त्यांनी खरपूस समाचार घेतला.

काँग्रेसला वस्तुस्थिती मांडता येत नाही!

काँग्रेसने देशात कोरोना पसरवला, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. पण काँग्रेस पक्षाला वस्तुस्थिती मांडता आली नाही. काँग्रेसच्या सोनिया गांधी दुबळ्या झाल्यात, त्या वस्तुस्थिती मांडू शकत नाहीत. खरं तर अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतातील आगमनानंतर देशांमध्ये कोरोना पसरला आहे, ही वस्तुस्थिती आहे. मात्र काँग्रेस पक्ष सत्य मांडू शकला नाही, असं म्हणत त्यांनी केंद्र सरकार आणि काँग्रेस पक्षालाही सुनावलं.

गुन्हे दाखल झालेले मंत्री ठाकरे सरकारमध्ये!

गुन्हे दाखल झालेले मंत्री राज्य सरकारमध्ये आहेत. यशोमती ठाकूर आणि बचू कडू यांना कोर्टाने शिक्षा देऊनही त्यांना मंत्री मंडळात ठेवायचं का? हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे. उद्धव ठाकरे त्यांना घरचा रस्ता दाखवणार का? त्यांच्यात नितीमत्ता असेल तर ते काहीतरी पाऊल उचलतील, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

काँग्रेसला ऑफर, मनसे-भाजप नो एन्ट्री

मनसे आणि भाजपसाठी आमच्याकडून आघाडीसाठी दरवाजे बंद आहेत. इतर पक्षासाठी आमचे दरवाजे खुले आहेत. काँग्रेसला तर आम्ही ऑफर दिली आहे. महाविकास आघाडीचं सरकार रडत पडत मारामाऱ्या करत पाच वर्षे चालेल, असंही आंबेडकर म्हणाले.

सोम्या गोम्यावर उत्तर देणार नाही

संजय राऊत यांचे निकटवर्तीयांवर कोव्हिड सेंटरमध्ये घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. त्यावर पत्रकारांनी आंबेडकर यांना प्रश्न विचारला असता, मी सोम्यागोम्याच्या वरती विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला, याठिकाणी बसलेलो नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here