पुणे,दि.28: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना सल्ला दिला आहे. मनोज जरांगे यांनी आंदोलन सुरू केल्यापासून प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. मराठा आरक्षणावरून प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वीच अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला होता.
प्रकाश आंबेडकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचा हवाला देत अजित पवार यांच्यावर टीका केली होती. आंबेडकर म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात पॅरा 56 किंवा 57 मध्ये महत्वाचा मुद्दा आहे. त्यात म्हटले आहे की, मराठा समाज श्रीमंत आहे. आमच्यासमोर तसा अहवाल आला. त्या अहवालानुसार सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळले. हा सर्व खेळ भाजपचा आहे. अजित पवार यांचा आहे. एनसीपीचा आहे. सर्वोच्च न्यायालयापुढे असा अहवाल आला नसता तर… यामुळे यांच्यापासून गरीब मराठ्यांना सावध राहिले पाहिजे.
तर इथला निजामी मराठा तुम्हाला कधी संपवेल…
आता परत एकदा त्यांनी मनोज जरांगे यांना सल्ला दिला आहे. राज्यात उभं केलेलं हे मराठा आंदोलन जिरवायचं नसेल तर तुम्हाला निवडणुकीत उभं राहिल्याशिवाय पर्याय नाही. निवडणुकीत उभे राहिला नाहीत, तर इथला निजामी मराठा तुम्हाला कधी संपवेल तुम्हाला कळणार सुद्धा नाही. गरिबांच्या चळवळी कधीच उभ्या राहू दिल्या नाहीत. आपण गरिबांच्या आणि उपेक्षितांच्या चळवळी उभ्या करत आहोत या चळवळीमध्ये एकजूट होणे महत्वाचे असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.