“छत्रपती शिवरायांनी सूरत लुटली होती, आता सूरतेचे दोन जण…” उध्दव ठाकरे

0

कोल्हापूर,दि.2: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मोदींचं सरकार हे गझनी सरकार असून मोदींनी आता गाईवर बोलतात तसं महागाईवर बोललं पाहिजे. चाय पे चर्चा करता, तसं मुद्द्यांवरही चर्चा केली पाहिजे, असं थेट आव्हान उद्धव ठाकरे यांनी हातकणंगलेतून केलं. महाविकास आघाडीचे हातकणंगले लोकसभेचे उमेदवार सत्यजित आबा पाटील सरुडकर यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते.

महाराष्ट्र दिनी हुतात्म्यांना वंदन करून त्यांनी महाराष्ट्र लुटणाऱ्यांवर हल्लाबोल केला. ‘आज महाराष्ट्र दिन आहे. संयुक्त महाराष्ट्रासाठी जो लढा संपूर्ण महाराष्ट्राने दिला, रक्त सांडलं, हुतात्मे दिले त्या संघर्षाची यशोगाथा सांगणारा आजचा दिवस आहे. म्हणून सर्वप्रथम मी त्या हुतात्म्यांना मी वंदन करतो. मध्यरात्री मी त्यांना वंदन करून एक शपथ घेतली आहे. तुम्ही घेणार की नाही, हा तुमचा प्रश्न आहे. कारण त्यावेळी जे हुतात्मे झाले तो आकडा 105 आहे. पण ताया झिंकीन या महिला पत्रकाराने रुग्णालयात दोन ते अडीचशे मृतदेह पडल्याचं नमूद केलं आहे. मोरारजी देसाईंनी गोळीबाराचे आदेश दिले होते. माणसांना मारण्याचे आदेश त्यांनी दिले होते.

छत्रपती शिवरायांनी सूरत लुटली होती, आता सूरतेचे दोन जण…

मराठी माणसं मेली तरी चालतील पण गोळी वाया जाता कामा नये. छत्रपती शिवरायांनी सूरत लुटली होती. आता सूरतेचे दोन जण महाराष्ट्र लुटताहेत. मी शपथ घेतली आहे की महाराष्ट्राला लुटणाऱ्या लुटारूंचा सुपडा साफ केल्याशिवाय मी राहणार नाही. महाराष्ट्राला जे लुबाडताहेत, ओरबाडताहेत त्यांना नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही. ही शपथ घेऊन मी मैदानात उतरलो आहे. डोळ्यांदेखत महाराष्ट्र लुटणारे हे वखवखणारे आत्मे महाराष्ट्रातच मत मागायला फिरू कसे शकतात? ‘ असा रोखठोक सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.

नाहीतर तुम्हाला खांदा द्यायला आज महाराष्ट्रात…

‘मी तुमची माफी मागतो कारण मागच्यावेळी मीच तुम्हाला सांगितलं होतं. मला वाटलं नावासारखा असेल पण इतकं धैर्य हरणारा माणूस मी नव्हता पाहिला. पण गद्दारी माझ्याशी झालेली नाही. हा तर खोकेबाज निघालाच पण ज्या मोदींसाठी मी मतं मागितली होती, त्या मोदी सरकारने महाराष्ट्राशी द्रोह केलाय, गद्दारी केली. माझ्यासोबत इथे असणाऱ्यांचा पराभव जाणूनबुजून केला गेला. हे भाजपवाले इतके नालायक आहेत. संपूर्ण देशात भाजपला कुणी जवळ घेत नसताना शिवसेनेने खांद्यावर बसवून महाराष्ट्र दाखवला. नाहीतर तुम्हाला खांदा द्यायला आज महाराष्ट्रात माणूस दिसला नसता. पण तुम्ही माझ्या शिवसैनिकांचा वापर केला आणि शिवसेनेच्या निवडणुकीत पाडापाडीचे धंदे केले. मी याचा सूड घ्यायला आलोय.’


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here