मुंबई,दि.27: मराठा आरक्षणाकरिता मराठा समाजाने आंदोलन सुरू केले होते. राज्य सरकारने मनोज जरांगे-पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून मध्यरात्री अध्यादेश देखील काढला. या अध्यादेशात सग्यासोयऱ्यांच्या मुद्द्याचाही समावेश करण्यात आला आहे. यानंतर आता ओबीसी नेत्यांची प्रतिक्रिया समोर येऊ लागली आहे.
राष्ट्रवादीचे (अजित पवार) नेते मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला सरकारने आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. हा मसुदा आहे, सुचना आहे असे भुजबळ म्हणाले. झुंडशाहीने कायदे बदलता येत नाही. उद्या लाखो लोक घेऊन अजून कोणी आले तर आपण कायदा बदलणार आहोत का? असा सवाल त्यांनी आपल्याच सरकारला केला. यासंदर्भात मराठा समाजातील नेते आणि विचारवंत यांनीही विचार करण्याची गरज असल्याचे भुजबळ यांनी म्हटले.
फक्त एकाच समाजाला मोफत शिक्षण कशासाठी?
मग फक्त त्यांनाच मोफत शिक्षण का? सर्वांचे शिक्षण मोफत द्या. फक्त एकाच समाजाला मोफत शिक्षण कशासाठी? असा प्रश्न त्यांनी विचारला. आता सर्व प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी उद्या पाच वाजता सरकारी निवासस्थानी छगन भुजबळ यांनी बैठक बोलवली आहे. या बैठकीला सर्व पक्षांनी ओबीसीच्या छत्राखाली एकत्र या, असे आवाहन त्यांनी केले.
इतर जातींसोबत जागा मिळविण्यासाठी झगडावे लागेल
मराठा समाजाला सांगावेसे वाटतेय तुम्ही जिंकलात असे तुम्हाला वाटतेय. या १७ टक्क्यांमध्ये जवळपास आणखी ८५ टक्के लोक येतील. हे सर्व एकाच ठिकाणी येतील. ईड्ब्ल्यूएसमध्ये जे १० टक्के मिळत होते. ते आता यापुढे मिळणार नाही. ओपनमध्ये जे उरलेले ४० टक्के होते त्यात जे ४० टक्के मिळत होते ते तुम्हाला मिळणार नाही. आता तुम्ही ज्या ५० टक्क्यांत खेळत होता. तिथे दुसरे कोणीच नाहीय. जवळपास ७४ टक्के समाज नाही. ती संधी गमावली आहे. २-३ टक्के ब्राम्हण समाज होता. या सगळ्यावर पाणी सोडावे लागेल. तुम्हाला १७ टक्क्यांत जावे लागेल आणि ओबीसी व इतर जातींसोबत जागा मिळविण्यासाठी झगडावे लागेल असे भुजबळ म्हणाले.
सरसकट गुन्हे मागे घ्या ही मागणी मान्य झाली. त्याबद्दल छगन भुजबळ यांनी संताप व्यक्त केला. उद्या कोणी घरे जाळली तरी गुन्हे मागे घ्या, असे कसे चालणार आहे, असा सवाल त्यांनी आपल्याच सरकारला विचारला. मराठा समाजातील सर्व मुले आणि मुलींना शंभर टक्के शिक्षण मोफत देण्याचा निर्णय झाला.