PM नरेंद्र मोदींनी सांगितले मतदार भाजपाला निवडून का देतात

0

नवी दिल्ली,दि.4: रविवारी तेलंगण, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले. यापैकी तेलंगण वगळता इतर तिन्ही राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीने अभूतपूर्व यश मिळवलं. राजस्थान, मध्य प्रदेशबरोबरच छत्तीसगडमध्येही भाजपाने बहुमताचा आकडा सहज गाठला. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2024 च्या निवडणुकीमध्ये भाजपाचाच विजय होणार हे निश्चित झाल्याचं म्हटलं आहे. भाजपाच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींनी नवी दिल्लीमधील भाजपाच्या मुख्य कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांना संबोधित केलं.

भारत माता की जय हाच आमचा मंत्र

पंतप्रधान मोदींनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना, “भारतीय जनता पार्टीने सेवा आणि सुशासनाच्या राजकारणाचं नवीन मॉडेल देशासमोर ठेवलं आहे. आमच्या निती आणि धोरणांच्या मुळाशी देश आणि देशवासी आहेत. भारत माता की जय हाच आमचा मंत्र आहे. त्यामुळे भाजपाची सरकारं केवळ धोरणं तयार करत नाहीत तर प्रत्येक लाभार्थ्याला त्याचा लाभ व्हावा हे सुनिश्चित करतं. काम करणं आणि त्याचे प्रत्यक्षात फायदे मिळवून देण्याचं राजकारण सत्यात उतरु शकतो हे भाजपाने दाखवून दिलं आहे,” असं म्हटलं.

…म्हणून मतदार भाजपाला निवडून देतात

थेट काँग्रेसचा उल्लेख न करताना पंतप्रधान मोदींनी, “भारतामधील मतदार ओळखतात की स्वार्थ काय आहे. जनहित आणि राष्ट्रहीत काय आहे हे सुद्धा मतदारांना ठाऊक आहे. दूध आणि पाण्यामधील फरक भारतीयांना बरोबर समजला आहे. वाटेल त्या पद्धतीने केवळ जिंकण्यासाठी हवेतल्या बाता करणे आणि लोभ, हव्यासाच्या गोष्टी करणे हे मतदारांना आवडत नाही. मतदारांना त्याचं आयुष्य उत्तम करण्यासाठी एक स्पष्ट रोडमॅप आणि विश्वास हवा. भारतीय मतदार हे जाणतात की जेव्हा भारत पुढे जातो तेव्हा राज्य पुढे जातं. प्रत्येक कुटुंबाचं जीवनमान सुधारतं. त्यामुळेच मतदार भाजपाला निवडून देत आहेत. ते सातत्याने भाजपाला निवडून देत आहेत,” असंही म्हटलं. तसेच पंतप्रधान मोदींनी, “काही लोक तर म्हणत आहेत की आजच्या या हॅट-ट्रिकने 2024 मधील हॅट-ट्रिकची गॅरंटी दिली आहे,” असं म्हणताच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here