माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध परमबीर सिंह यांच्याकडे पुरावेच नाहीत

0

मुंबई,दि.३: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवत परमबीर यांनी देशमुख यांच्यावर खंडणीवसुलीचा आरोप केला होता. याच प्रकरणात सोमवारी अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली असताना देशमुख यांच्याविरुद्ध पत्राच्या पलीकडे कोणताही पुरावा परमबीर यांच्याकडे नसल्याची धक्कादायक बाब आता समोर आली आहे.

परमबीर यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय व ईडीकडून चौकशी सुरू करण्यात आली होती, त्याचवेळी राज्य सरकारनेही या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले होते. निवृत्त न्यायमूर्ती कैलाश उत्तमचंद चांदिवाल यांचा एकसदस्यीय चौकशी आयोग सरकारने नेमला आहे. या आयोगासमोर परमबीर यांनी वकिलामार्फत आपलं प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. त्यात अनिल देशमुख यांच्याविरुद्ध आणखी कोणताही पुरावा माझ्याकडे नसल्याचे परमबीर यांनी नमूद केले आहे. सिंग यांच्या वकिलांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. परमबीर यांनी हे प्रतिज्ञापत्र गेल्या सुनावणीच्यावेळी आयोगासमोर सादर केलं आहे, असेही या वकिलांनी सांगितले.

विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनीही याबाबत महत्त्वाची माहिती दिली. परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्याविरुद्ध जे पत्र लिहिलं आहे त्यापलीकडे कोणताही पुरावा देण्यास नकार दिला आहे, असे हिरे यांनी सांगितले. परमबीर या प्रकरणात उलटतपासणीसही तयार नसल्याचे हिरे यांनी नमूद केले.

दरम्यान, अनेकदा समन्स बजावून तसेच जामीनपात्र वॉरंट बजावूनही परमबीर हे अद्याप एकदाही चौकशी आयोगासमोर हजर झालेले नाहीत. आयोगाने सुनावणीला गैरहजर राहिल्याबद्दल आतापर्यंत तीनवेळा परमबीर यांना दंड ठोठावला आहे. दुसरीकडे परमबीर यांच्याविरुद्ध खंडणीसह गंभीर गुन्हे दाखल असून मुंबई व ठाणे येथील कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट बजावलेले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here