जालना,दि.26: भाजपा नेत्या जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावे याकरिता अंतरवाली सराटीत 25 जानेवारीपासून उपोषण सुरू केले आहे. प्रजासत्ताक दिना निमित्त पंकजा मुंडे जालन्यात आल्या होत्या.
यावेळी पंकजा मुंडे यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देत अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. त्यावेळी जरांगेंच्या उपोषणाबाबत त्यांना विचारण्यात आलं. शिवाय जरांगेंची तुम्ही सरकारचे प्रतिनिधी म्हणून भेट घेणार का? असा प्रश्नही त्यांना करण्यात आला. जरांगे ज्या जालना जिल्ह्यातील आहेत त्या जिल्ह्याच्या मुंडे पालकमंत्री आहेत.
त्यांच्या बद्दल आपल्याला सन्मान
मनोज जरांगे पाटील हे त्यांचा लढा लढत आहेत. त्यांच्या उपोषणाबद्दल माझ्या मनात सन्मान आहे. संविधानाच्या चौकटीत बसवून त्यांच्या किंवा कोणाच्याही लढ्याला न्याय मिळावा, हीच माझी भूमिका आहे. मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. माझा या जिल्ह्यातील पहिलाच दिवस आहे. त्यांच्याशी चर्चा करुन त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर नक्कीच मी तयार आहे. त्यांनी चर्चेची तयारी दाखववी तर आपलीही चर्चा करण्याची तयारी आहे.
मात्र ही चर्चा करताना तिथे गेल्यावर तिथंलं वातावरण नियंत्रणात ठेवणं ही त्यांची जबाबदारी आहे. मी तसा निरोप त्यांना पाठवणार आहे. शिवाय त्यांच्या निरोपाची प्रतिक्षाही करणार आहे असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांनी जरांगे पाटील यांना भेटण्याची तयारी दाखवली आहे. पण दुसरीकडे तिथे काही तरी गडबड होवू शकते यांची अप्रत्यक्ष भितीही व्यक्त केली आहे. त्यामुळे आता चेंडू हा मनोज जरांगे पाटील यांच्या कोर्टात आहे. त्यामुळे ते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.