महावितरणच्या अभियंता, कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या तिघांना एक वर्ष सक्तमजुरी

0

मुंबई,दि.२३: वीजचोरी करणाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या महावितरणच्या सहायक अभियंत्यासह कर्मचाऱ्यांना धक्काबुकी करून महिला कर्मचाऱ्याचा विनभयंग केल्याप्रकरणी औरंगाबाद जिल्ह्यातील आसेगाव (ता.गंगापूर) येथील तिघांना एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.आर.जगदाळे यांनी ठोठावली.

महावितरणचे सहायक अभियंता श्रीकांत बाळासाहेब गोरे हे पथकासह ६ ऑगस्ट २०१८ रोजी आसेगाव परिसरात वीजचोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेले होते. मकसूद खान याच्या घरातील विजेची तपासणी केली असता तो वीजचोरी करीत असल्याचे समोर आले. त्यामुळे त्याच्या घराचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यानंतर मकसूद खान याने सहायक अभियंता गोरे यांना धक्काबुक्की व मारहाण केली. पथकातील कर्मचाऱ्यांनादेखील धक्काबुक्की करून एका महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केला. या प्रकरणात दौलताबाद पोलीस ठाण्यात मकसूद खान मकबुल खान पठाण (वय ३८), मोहसीन खान मकबुल खान पठाण (वय २५) आणि हरिभाऊ पंढरीनाथ राजगुरू (३३) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

न्यायालयात खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक लोकाभियोक्ता मनीषा गंडले यांनी ६ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवून भादंवि कलम ३५३ अन्वये एक वर्ष सक्तमजुरी आणि भादंवि कलम ३२३ अन्वये एका महिन्याच्या साध्या कारावसाची शिक्षा ठोठावली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here