मुंबई,दि.३१: उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादीत विलीन करणार असल्याचा भाजपा आमदार नितेश राणे यांनी दावा केला आहे. भाजपाचा झेंडा हा शेठजी आणि व्यापाऱ्यांचा झेंडा आहे असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही त्यांनी कडाडून टीका केली आहे. या सगळ्यावर आता भाजपा आमदार नितेश राणेंनी उत्तर दिलं आहे. तसंच उद्धव ठाकरे हे त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष १९ जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन करणार आहेत असा दावा नितेश राणे यांनी केला आहे.
काय म्हणाले भाजपा आमदार नितेश राणे?
नितेश राणे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होण्याची तयारी उद्धव ठाकरेंची आहे. संजय राऊतांनी २०० कोटी घेऊन महाविकास आघाडीसाठी पुढाकार घेतला. आता राऊतांना उद्धव ठाकरेंची समजूत घालण्यासाठी तुम्ही राष्ट्रवादीत विलीन करा यासाठी १०० कोटींची ऑफर मिळाली आहे. तुमची आणि उद्धव ठाकरेंची महाराष्ट्राच्या राजकारणात किती लायकी राहिली त्यावर अग्रलेख लिहावा असा टोला त्यांनी राऊतांना लगावला.
दरम्यान, उद्धव ठाकरेंना शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार नाही. शिवसेना ही एकनाथ शिंदेंकडे आहे. उबाठा गटाची स्थापना १० ऑक्टोबर २०२२ ची आहे. उद्धव ठाकरेंना शिवसेना नाव वापरण्याचा अधिकार नाही. ज्यांच्या हातात पक्ष नाही ते अधिकृत वर्धापन दिन कसा साजरा करू शकतात. शिवसेना हे नाव आणि चिन्ह हे निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेंना दिला आहे. उद्धव ठाकरेंचा मेळावा हा बेकायदेशीर आहे. स्वत: राजकीय लावारिस असलेल्यांनी दुसऱ्यांच्या आईवडिलांवर बोलू नये असंही नितेश राणेंनी टीका केली.
भाजपा-शिवसेनेचा भगवा झेंडा मुंबईवर फडकणार
भाजपाचा झेंडा हा हिंदुत्वाचा प्रतीक आहे, मराठी माणसाचा अभिमान आहे. या मराठी माणसाला तुम्ही मुंबईतून हद्दपार केले. मराठीचा टक्का बघा, तुमच्या दलालीमुळे हे झाले. उद्धव ठाकरे लंडनला गेलेत ते कोणाच्या पैशावर गेलेत? कार खरेदी करण्यासाठी, परदेश दौऱ्यासाठी व्यापारी चालतात. लंडनमधील हॉटेल आणि शॉपिंगचे बिल कोण देतेय? याचे नाव जाहीर करू का? मुंबई महापालिकेवर भाजपा-शिवसेनेचा झेंडा फडकणार आहे. तो भगवाच आहे असा विश्वास नितेश राणेंनी व्यक्त केला.