राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मोठं विधान

0

दि.16: राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री पद उद्धव ठाकरेंनी स्वीकारल्यापासून त्यांच्यावर टीका केली जात आहे. महाविकास आघाडीचे सरकार (mva government) आल्यानंतर मुख्यमंत्री कुणाला करायचा असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी मीच उद्धव ठाकरे यांचा हात उंचावून मुख्यमंत्रिपदासाठी आग्रह केला होता, असा खुलासा करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांना चांगलेच फटकारून काढले. तसंच, काही माहिती असेल तर नक्की बोला पण वाटेल ते आरोप करू नका, अशी तंबीही पवारांनी फडणवीसांना दिली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद (sharad pawar press conference) घेऊन एनसीबी कारवाई, आयकर विभागाच्या धाडी आणि भाजप नेत्यांच्या आरोपांवर सविस्तर उत्तर दिली. यावेळी शरद पवार यांनी फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या निवडीबाबतच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला.

‘महाविकास आघाडीचे सरकार झाले, तेव्हा हे सरकार बनवण्यासाठी तिन्ही पक्षांचा हात होता. माझाही त्यात सहभाग होता. त्यावेळी आमदारांची बैठक घेतली. त्यावेळी नेतृत्व कुणी करायचं तीन चार नाव समोर आली. त्यावेळी मी उद्धव ठाकरे यांचा हात धरून उंचावला आणि उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील हे मी सांगितलं. पण, त्यावेळी उद्धव ठाकरे यांची हात उंचावण्याची तयारी नव्हती. त्यांची मुख्यमंत्री होण्याची तयारी नव्हती. त्यांना सक्तीने हातवर करावा लागला’ असं शरद पवारांनी स्पष्टपणे सांगितलं.

‘या लोकांना मी वयाच्या ३ -४ वर्षांपासून पाहिलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत माझे वैयक्तिगत मतभेद होते. पण त्यांच्या सारखा दिलदार माणूस नव्हता. त्यांनी महाराष्ट्रासाठी जे योगदान दिले आहे ते विसरता कामा नये. त्यांच्या पक्षाने जे काम केले आहे, त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या अर्थात त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्याचा माझा आग्रह होता. माझा आग्रह असल्यामुळे सर्वांनी स्वागत केलं आणि त्याची निवड झाली. सर्व आमदारांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं. पण, माझी फडणवीस साहेबांना विनंती आहे, उगाच कुठल्याही गोष्टींवर आक्षेप घेऊ नये, तुम्हाला जर यातील काही माहिती असेल तर बोला, पण तुम्ही सेनेसोबत पाच वर्ष काम केले आहे. त्यामुळे तुम्हाला कामाचा अनुभव आहे. त्यामुळे असं आरोप करू नये’ असा सल्लावजा टोलाही फडणवीसांना लगावला.

‘उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्याची जबाबदारी घेतली, त्यांची काम करण्याची पद्धत ही वेगळी आहे. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा काम आल्यावर तिथे जाऊन पाहणी करत होतो. एखादं संकट आल्यावर निर्णय घेणारा माणूस हा एका ठिकाणी बसून राहिला पाहिजे. म्हणून उद्धव ठाकरे यांच्यावर सतत टीका केली जात आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर कोरोना आला, वादळं आली. प्रत्येक वेळी उद्धव ठाकरे यांनी सरकारने काय करावे, यासाठी पूर्ण ताकदीने काम केले. कोरोनाच्या मोठ्या संकटातून मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लढा देऊन बाहेर काढले. त्यांचे काम उत्तम आहे, असं कौतुकही पवारांनी केलं.

‘त्यांनी किती छापे मारले, ठीक आहे, त्यांना किती कारवाई करायची आहे त्यांनी करावी, पण हे सरकार पाच वर्ष पूर्ण करणार आहे. आणि पुन्हा सत्तेत येईल याची मला खाञी आहे’ असा विश्वासही पवारांनी व्यक्त केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here