अहमदनगर,दि.27: राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी शिवसेनेच्या अंतर्गत वादावर मोठं वक्तव्य केलं आहे. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे. शिवसेना कोणाची हा प्रश्न उपस्थित झाला असून त्यात सुप्रीम कोर्टात लढाई सुरू आहे. ही लढाई दुर्दैवी असल्याचं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचं नाव चालतं, बाकी सगळं काही चालतं मग बाळासाहेबांसाठी सर्वस्व असलेलं मुलगा आणि नातू त्यांना का चालत नाही? असा सवाल सुळे यांनी उपस्थित केला आहे. पारनेरमध्ये आमदार निलेश लंके प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून एक लाख महिलांची मोहटा देवी दर्शनाची मोफत बस सेवा सुरू करण्यात आली. त्याच्या उद्घाट्नाला सुप्रिया सुळे अहमदनगरला आल्या होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या.
जर तुमच्यात मतभेद असतील तर तुम्ही दुसरं घर करा तुम्हालाही शुभेच्छा. परंतु, अशाप्रकारे ठाकरे कुटुंबावर आरोप करणं चुकीचं असल्याचे मत त्यांनी व्यक्त केलंय. शरद पवार यांच्यावर ज्यावेळेस काँग्रेसने कारवाई केली, त्यावेळेस साहेबांनी स्वतंत्र पक्ष काढून उभे राहिले त्यावेळेस त्यांनी काँग्रेस माझी आहे, त्यातील माणसं माझी आहे असे म्हटले नाही. सध्याचे राजकारण पाहून बाळासाहेबांना खूप वेदना होत असतील असेही सुप्रिया म्हणाले.
पारनेर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांचं कुटुंब बघून मला आर आर पाटलांच्या कुटुंबाची आठवण येत असल्याचं मत सुप्रिया सुळे यांनी वेक्त केले. त्या पारनेरमध्ये आमदार निलेश लंके प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून एक लाख महिलांची मोहटा देवी दर्शनाची मोफत बस सेवा सुरू करण्यात आली. त्याच्या उद्घाटनाला आल्या होत्या. यावेळेस त्यांनी आमदार निलेश लंके यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यावेळेस त्यांना राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील यांची आणि त्यांच्या कुटुंबाची आठवण झाली असं सुळे म्हणाल्या.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पुणे येथे केलेल्या वक्तव्यामुळे ते चांगलेच अडचणीत आले आहे. त्यावर बोलताना सुळे म्हणाल्या की, एखाद्या मुद्द्यावर मत मांडणं यात काही चुकीचं नाही. छगन भुजबळ यांनी मांडलेला तो एक विचार आहे. याबाबत त्यांची भेट झाल्यानंतर नक्कीच त्यांचं मार्गदर्शन घेईल. कोणीही मत मांडले म्हणजे तो शत्रू झाला असं होत नाही. संविधानाने त्याला तो अधिकार दिलेला असतो. परंतु, सत्ताधारी पक्षाला दडपशाहीची सवय झाली आहे. मी म्हणेन तसंच वागलं पाहिजे यामुळे संविधानाचा अपमान होत आहे.
भारतीय जनता लॉन्ड्रीचे अध्यक्ष
भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष नड्डा यांचा एकपक्ष एक देश असा विचार आहे तर आमचा विचार तसा नसून एक देश अनेक पक्ष असा विचार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हंटलय. तसेच कुठलाही पक्ष छोटा किंवा मोठा नसतो. त्याच्या मागे एक वैचारिक बैठक असते. भाजप हा मोठा पक्ष आहे. देश पातळीवरचा पक्ष आहे. ते राजे आहेत त्यांनी छोट्या लोकांची चेष्टा करावी ही त्यांची संस्कृती असेल असा टोलाही त्यांनी लगावला. भाजपचे अध्यक्ष नड्डा यांचा उल्लेख करताना भारतीय जनता लॉन्ड्रीचे अध्यक्ष असा उल्लेख सुप्रिया सुळे यांनी केला. तर भाजपचा त्यांनी भारतीय जनता लॉन्ड्री असा वारंवार उल्लेख केलाय.