मुंबई,दि.10 : राष्ट्रवादीचे नेते राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik) यांनी एनसीबीचे समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याविरुद्ध आरोपांची मालिका सुरू केली होती. समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचे वडील ज्ञानेश्वर वानखेडे (Dnyaneshwar Wankhede) यांनी नवाब मलिक यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा मुंबई हायकोर्टात दाखल केला होता. नवाब मलिक यांना समीर वानखेडे व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात काहीही आक्षेपार्ह बोलण्यास मनाई करण्यात यावी अशी मागणी ज्ञानेश्वर वानखेडे (Dnyaneshwar Wankhede) यांनी केली होती.
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडे प्रकरणात मुंबई हायकोर्टात हमी देणारे प्रतिज्ञापत्र सादर केले. या वेळी त्यांनी कोर्टात खेद व्यक्त केला. कोर्टाच्या आदेशाचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता. बिनशर्त माफी मागतो आणि यापुढे अशी विधाने करणार नाही, अशी हमी त्यांनी कोर्टात प्रतिज्ञापत्राद्वारे दिली.
वानखेडे कुटुंबीयांविरोधात कोणतीही आक्षेपार्ह विधाने करणार नाही, अशी लेखी हमी मलिक यांनी दिली होती. मात्र, मलिक यांनी एका मुलाखतीत आक्षेपार्ह विधाने केली, असे निदर्शनास आणणारा अर्ज समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव यांनी सोमवारी हायकोर्टात केला होता. त्यावर मलिक यांनी कोर्टात दिलेल्या हमीचे जाणीवपूर्वक उल्लंघन केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असून, ते कोर्टाच्या आदेशाचेही उल्लंघन ठरते, असे कोर्टाने म्हटले होते. या कृतीवर कोर्टाच्या अवमानाची नोटीस का काढू नये, अशी विचारणा करत, याचे उत्तर शुक्रवारपर्यंत प्रतिज्ञापत्राद्वारे दाखल करण्याचे निर्देश मलिक यांना दिले होते.
कोर्टाच्या आदेशानुसार, मलिक यांनी आज, शुक्रवारी प्रतिज्ञापत्र सादर केले. ज्येष्ठ वकील चिनॉय यांच्यामार्फत त्यांनी हे प्रतिज्ञापत्र सादर केले. ‘मी फक्त माझ्या सरकारी सेवकपदाच्या अधिकारात वक्तव्ये केली. मी वानखेडे यांच्याविषयी कोणतीही व्यक्तिगत विधाने केली नाहीत,’ असे मलिक यांनी सांगितले. ‘यापूर्वी व्यक्त केलेल्या वक्तव्यांविषयी खेद व्यक्त करतो. कोर्टाच्या आदेशाचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता. बिनशर्त माफी मागतो आणि यापुढे विधाने करणार नाही, अशी हमी देतो, अशी हमी मलिक यांच्याकडून हायकोर्टात देण्यात आली.