Nawab Malik: ईडीकडून होणाऱ्या कारवाईची सर्व सूत्रे हाताळणाऱ्या भाजपा नेत्याचे नवाब मलिक यांनी नाव केले जाहीर

0

मुंबई,दि.९: Nawab Malik On BJP: शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून मोठा दावा केला आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी मदत करण्यास नकार दिल्यानंतर ईडीने त्यांच्यासह कुटुंबीयांना त्रास देण्यास सुरुवात केली आहे असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. तपास यंत्रणेच्या माध्यमातून केंद्र सरकार त्रास देत असल्याचे राऊत यांनी म्हटले होते. तसेच तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचे म्हटले होते.

यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनीही भाजपवर तोफ डागली आहे. हे सगळं कटकारस्थान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आहे. ते ईडीच्या अधिकाऱ्यांना कोणावर आणि कशी कारवाई करायची, याबद्दल सूचना देत आहेत. महाविकासआघाडीच्या नेत्यांविरुद्ध ईडीकडून होणाऱ्या कारवाईची सर्व सूत्रे देवेंद्र फडणवीस हाताळत असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला. ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राज्यातील सत्ता गेल्यानंतर भाजपला महाविकास आघाडी सरकार पाडायचे आहे. तीनपैकी एक पक्ष त्यांच्यासोबत जाण्याची परिस्थिती त्यांना निर्माण करायची आहे. त्यासाठी सेना नेत्यांच्या मागे ईडी लावली जात आहे. आमच्या नेत्यांच्यामागेही चौकशीचा ससेमिरा लावत आहेत. भाजपला वाटतंय घाबरुन सरकारमधून बाहेर पडतील व सोबत येतील हा भाजपचा गैरसमज आहे, असेही नवाब मलिक यांनी ठणकावून सांगितले.

उत्तर द्यावे लागेल

ईडीच्या माध्यमातून भीती निर्माण करुन सत्ता काबीज करता येणार नाही. हे महाराष्ट्र आहे. पवारसाहेबांना नोटीस दिल्यानंतर तुमची काय परिस्थिती झाली होती हे राज्याने पाहिले होते त्यामुळे तुम्ही जितका केंद्रीय यंत्रणांचा वापर करून सरकारला दाबण्याचा प्रयत्न करणार तितक्या ताकदीने महाराष्ट्राची जनता आमच्यासोबत राहील, असा विश्वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला.

संजय राऊत यांनी लिहिलेली परिस्थिती सत्य आहे. या सगळ्या कारवायांना कुणीही घाबरणार नाही. ईडीचा अधिकारी राजेश्वर सिंग राजीनामा देतो आणि त्याला उत्तरप्रदेशमधून भाजप तिकिट देते याचा अर्थ ईडीचे अधिकारी भाजप कार्यकर्ते आहेत. सत्तेचा वापर करून हे करत आहात परंतु सत्ता गेल्यानंतर विरोधक जर असं वागले तर तुमची काय परिस्थिती होईल हे भाजपला आणि अधिकार्‍यांना कळलं पाहिजे. सत्ता काय अमर नसते. सत्ता परिवर्तन झाल्यावर त्याचे उत्तर अधिकार्‍यांना द्यावे लागणार आहे. त्यामुळे ईडीच्या अधिकार्‍यांनी कायद्याने काम करावे भाजप कार्यकर्ता म्हणून काम करु नये असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here