मुंबई,दि.29: भाजपा नेते केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी मराठा आरक्षणावरून आक्रमक पवित्रा घेतला आहे. राणे आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहिर करणार होते मात्र आजची पत्रकार परिषद रद्द करण्यात आल्याची माहिती नारायण राणे यांनी X वर पोस्ट करत दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याचे सांगत तसा अध्यादेश काढला.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर ओबीसी नेत्यांनी यावर आक्षेप घेतला आहे. मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेवरून नारायण राणेंनी नाराजी व्यक्त केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात लढवय्येपणाचा वारसा आणि इतिहास असलेल्या मराठा समाजाचं खच्चीकरण होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी. स्वाभिमानी मराठा कुणबी समाजात समाविष्ट होऊन आरक्षण घेणार नाहीत असं राणेंनी म्हंटलं.
या विषयावर मला महाराष्ट्र शासनाला विनंती करावयाची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात लढवय्येपणाचा वारसा आणि इतिहास असलेल्या मराठा समाजाचे खच्चीकरण होणार नाही याची काळजी घ्यावी. स्वाभिमानी मराठा कुणबी समाजामध्ये समाविष्ट होऊन आरक्षण घेणार नाही. याशिवाय तसे केल्याने इतर मागास वर्ग (ओबीसी) समाजावर अतिक्रमण होणार आहे असे नारायण राणे यांनी म्हंटले आहे.
या सगळया नाजूक प्रश्नाचा महाराष्ट्र सरकारने सखोल विचार करावा. महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाची संख्या 32 टक्के म्हणजे 4 कोटी एवढी आहे. कोणत्याही पदापेक्षा जात, धर्म आणि देश महत्वाचे आहेत एवढंच मला सांगावेसे वाटते असंही राणे X वर पोस्ट करत म्हणाले.