वाशिम,दि.१४: कृषी अधिकाऱ्याने शेतकऱ्याला बुटाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या निंदनीय घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. रखडलेल्या अनुदानाबाबत विचारणा केल्यानंतर कृषी अधिकाऱ्याने मारहाण केली. या घटनेनंतर संताप व्यक्त करण्यात येत आहे. वाशिम जिल्ह्याच्या मंगरुळपीर तालुक्यातील गोगरी परिसरात ही घटना घडली आहे. मनरेगा योजनेंतर्गत संत्रा फळबागेचे अनुदान रखडल्याबाबत विचारणा करणाऱ्या शेतकऱ्याला तालुका कृषी अधिकाऱ्याने बुटाने व मातीच्या ढेकळाने मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. गोगरी येथील शेतकरी ऋषिकेश पवार यांनी आपल्या तीन एकर शेतीत दोन वर्षापूर्वी मनरेगा योजनेंतर्गत संत्रा फळबाग लावली होती. या फळबागेसाठी शासनाकडून मिळणारे अनुदान चार महिन्यांपासून रखडल्याचं त्यांचं म्हणण आहे. यादरम्यान, मंगरुळपीरचे तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे हे गोगरी शिवारात पाहणी करण्यासाठी गेले असता, पवार यांनी त्यांच्याकडे रखडलेल्या अनुदानाबाबत विचारणा केली. आरोपानुसार, जाब विचारत असताना तालुका कृषी अधिकाऱ्याने शेतकऱ्याच्या अंगावर धाव घेत चक्क बुटाने मारहाण केली. याशिवाय, शेतातील मातीची ढेकळे उचलूनही पवार यांना मारल्याचा आरोप करण्यात आला आहे.
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी व्हिडीओ शेअर करत सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार शेतकरीविरोधी आहे. राज्याचे कृषिमंत्री म्हणतात, भिकारी सुद्धा एक रुपयाची भीक घेत नाही, पण एक रुपयात विमा सरकार देते; दुसरे आमदार म्हणतात, शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबाला अंगावरचे कपडे आणि पायातील चप्पल आम्ही देतो आणि मुजोर सरकारी अधिकारी शेतकऱ्यांच्या अंगावर धावून जात बुटाने मारहाण करतात. अशी टीका करत पटोले यांनी व्हिडीओ शेअर केला आहे.
मंगळूरपीर येथील तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे गोगरी शिवारात पाहणीसाठी गेला असता, पवार या शेतकरी बांधवाने त्यांच्या रखडलेल्या अनुदानाबाबत विचारणा केली. मात्र जाब विचारण्याऐवजी संबंधित कृषी अधिकाऱ्याने आपल्या पदाचा गैरवापर करत थेट शेतकऱ्याच्या अंगावर धावत जाऊन त्या शेतकऱ्याला बुटाने मारहाण केली तसेच शेतातील मातीची ढेकळे उचलून त्याच्यावर फेकली. इतक्यावरच न थांबता या मुजोर अधिकाऱ्याने शेतकऱ्याला “तुला गुन्ह्यात अडकवीन” अशी धमकी देत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. असेही पटोले यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.








