मुंबई,दि.19: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीकरिता 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. जागा वाटप अंतिम टप्प्यात आले असताना महाविकास आघाडीतील काँग्रेस व शिवसेना (ठाकरे गट) वादाची ठिणगी पडली आहे. महाविकास आघाडीतील दोन पक्षांनी वेगळी वाट धरण्याचे संकेत दिले आहेत. त्यातील एका पक्षाने तर थेट आपला उमेदवार जाहीर केला आहे. तर दुसऱ्या मित्र पक्षाने जर जागा सोडली नाही तर आघाडीतून बाहेर पडून स्वतंत्र निवडणूक लढण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे निवडणुकीला सामोरे जाण्या आधिच मविआमध्ये फूट पडते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहेत.
राज्यातील काँग्रेसचे नेते जागा वाटपाबाबत निर्णय घेण्यास सक्षम नसल्याचे विधान ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केल्याने काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजीची भावना आहे. त्यातही राऊत यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केल्याने मविआतील जागा वाटपाची चर्चा गुरुवारी जिथे संपली होती तिथेच थांबली आहे. तुटेपर्यंत ताणू नका, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
दोन दिवसात जागा वाटप संपू शकते, एवढ्या अंतिम टप्प्यात आले आहे, असेही ते म्हणाले. वाद सुरू असतानाच शरद पवारांनी शुक्रवारी काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाल आणि महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याशी जागा वाटपावर फोनवरून चर्चा केल्याचे समजते. येत्या एक ते दोन दिवसात जागा वाटप पूर्ण करण्याबाबत यावेळी चर्चा झाल्याचे समजते.
हे दोन पक्ष नाराज
समाजवादी पार्टी आणि शेतकरी कामगार पक्ष हे सध्या महाविकास आघाडीत नाराज आहेत. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालेगावमध्ये जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी जागा वाटपाची वाट न पाहात थेट आपला उमेदवार जाहीर केला. त्यांनी मालेगाव मध्य विधानसभा मतदार संघातून शान -ए-हिंद निहाल अहमद यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे मालेगावची जागा महाविकास आघाडीत समाजवादी पार्टीला सोडली गेली आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र अजूनही जागा वाटपाची चर्चा सुरू असताना थेट उमेदवार जाहीर केल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. शिवाय भिवंडीतून रईस शेख यांना ही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
समाजवादी पार्टीने जागा वाटपा आधीच आपला उमेदवार जाहीर केला होता. तर दुसरीकडे शेतकरी कामगार पक्षातही नाराजी असल्याचे दिसून येत आहे. सांगोला विधानसभा मतदार संघ महाविकास आघाडीत शेतकरी कामगार पक्षाला मिळावा अशी मागणी होत आहे. हा मतदार संघ दिवंगत गणपतराव देशमुख यांचा मतदार संघ म्हणून ओळखला जातो. शेकापचा हा गड देशमुखांनी कधी ढासळू दिला नव्हता. मात्र 2019 च्या निवडणुकीत इथून शिवसेनेचे शहाजीबापू निवडून आले आणि शेकापचा गड कोसळला. त्यामुळे या जागेवर सध्या शिवसेना ठाकरे गटाने दावा केला आहे.
मात्र शेकापने ही जागा आमचीच आहे अशी भूमीका घेतली आहे. तसे न झाल्यास मविआतून बाहेर पडण्याचा इशारा शेकापनं दिला आहे. या मतदार संघातून शेकापचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे इच्छुक आहे. 2019 च्या निवडणुकीत शेकापच्या उमेदवाराचा अगदी थोडक्या मतांनी या मतदार संघातून पराभव झाला होता.