मुंबई,दि.२५: जम्मू काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam) येथे मंगळवारी (दि.२२) झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला आहे तर १७ जण जखमी झाले आहेत. हा हल्ला पहलगामच्या बैसरन खोऱ्यात करण्यात आला, ज्यामध्ये दहशतवाद्यांनी निवडक (हिंदू) लोकांना लक्ष्य केले. धर्माच्या नावावर हल्ला करण्यात आला होता.
या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट आहे. हिंदू नागरिकांसह मुस्लिम नागरिकांकडूनही पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी होताना दिसत आहे. देशातील अनेक शहरात मुस्लिम संघटनांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. हल्ल्याविरोधात मुंबईत विविध धार्मिक आणि सामाजिक संघटनांनी निदर्शने केली. अखिल भारतीय सुन्नी जमियत उलेमा आणि रझा अकादमीकडून या हल्ल्याचा कठोर शब्दांत निषेध करण्यात आला.
काल (दि.२४) दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयाबाहेर हिंदू नागरिकांसह मुस्लिमांनी निदर्शने केली. यावेळी मुस्लिम संघटनेचे प्रतिनिधीदेखील सहभागी झाले होते. निदर्शने करणाऱ्या मुस्लिमांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे बॉर्डरवर जाण्याची मागणी केली आहे.
काय म्हणाल्या मुस्लिम संघटना ?
पाकिस्तानने अतिशय भ्याड कृत्य केलं आहे. हा पाक नाही तर हा नापाक देश आहे. असे मुस्लिम संघटनांचे म्हणणे आहे. धर्माच्या नावावर केले गेलेल्या हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बदला घ्यावा अशी मागणी मुस्लिम संघटनांनी केली आहे.
जय श्रीरामचे नारे देऊन…
दहशतवाद्यांनी कलमा वाचायला सांगत हिंदू आहे की मुस्लिम? असे विचारले आणि गोळ्या झाडल्या. हे दहशतवादी मुस्लिम असूच शकत नाहीत. मुस्लिम समाजातील लोकांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे आम्हाला बॉर्डरवर जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. आम्ही बॉर्डरवर जाऊन धर्म विचारणाऱ्या दहशतवादी मुस्लिमांना जय श्रीरामचे नारे देऊन मारू. कारण त्यांनी आमच्या हिंदुस्तानी भावांना मारलं आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया मुस्लिम संघटनांनी केली.