बनावट कागदपत्राद्वारे वारस नोंद प्रकरण
सोलापूर,दि.18: देविदास मनोहर बेलेराव ऊर्फ कोळी याची फसवणूक केल्याप्रकरणी तलाठी सुनील केरबा बेलभंडारे वय :-51, सिद्धेश्वर हरिविजय नकाते, वय : -37 दोघे रा. सोलापूर यांना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व्ही.जी.बिष्ट यांनी अटक न करण्याचा अंतरिम आदेश पारित केला.
यात हकीकत अशी की, मौजे ढोकबाभूळगाव,तालुका मोहोळ येथे देविदास मनोहर बेलेराव यांची गट क्र 391 मध्ये गायरान जमीन ही त्यांच्या वडिलांकडून वहिवाटिस आली होती व तहसीलदार मोहोळ यांच्या आदेशाने सदर जमिनीवर वहिवाट असल्याची नोंद देखील होती. सदर जमिनीवर त्यांचे चुलते, तलाठी व इतरांनी संगनमत करुन बनावट कागदपत्रे तयार करून गट क्र. 391 ची जमीन ही देविदास हा एकटाच वहिवाटीत असताना देखील इतर वारसांची नावे लावून त्याची व शासनाची फसवणूक केली, अशा आशयाची फिर्याद देविदास मनोहर बेलेराव यांनी मोहोळ पोलिस ठाण्यात दाखल केली होती.
त्यावर अर्जदारांनी जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता, तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता.
त्यावर अर्जदारांनी ॲड. रितेश थोबडे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात जामीन मिळणेसाठी अर्ज दाखल केला होता.अर्जाच्या सुनावणीच्या वेळेस ॲड. रितेश थोबडे यांनी आपली युक्तिवादात सदरचा गुन्हा हा कागदोपत्री स्वरूपाचा आहे. तसेच ते कोठेही पळून जाणार नाहीत असे मुद्दे मांडले. ते ग्राह्य धरून न्यायमूर्तींनी अर्जदारांना पुढील तारखेपर्यंत अटक न करण्याचे आदेश पारित केले.
यात अर्जदार तर्फे ॲड. रितेश थोबडे, ॲड. राजकुमार मात्रे तर सरकारतर्फे ॲड. पी.पी.शिंदे यांनी काम पाहिले.