मुंबई,दि.21: मुंबई ठाकरे गटाच्या नगरसेविकेला अपात्र करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला 65 जागांवर विजय मिळाला आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 6 जागांवर विजय मिळाला आहे. भाजपने सर्वाधिक जागांवर विजय मिळवला आहे. भाजपला 89 जागांवर विजय मिळाला आहे.
शिवसेना ठाकरे गटाकडून निवडून आलेल्या 65 नगरसेवकांपैकी एक नगरसेविकेने बंडखोरी केली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडून आल्यानंतरही ही नगरसेविका गट स्थापनेसाठी आज नवी मुंबईतील कोकण भवनामध्ये ठाकरेंच्या उर्वरित 64 नगरसेवकांसोबत गेली नव्हती. मात्र आता त्या शिंदेंच्या नगरसेवकांच्या नोदींच्या वेळी कोकण भवनाकडे रवाना झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात.
शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के यांना अपात्र करण्याची कार्यवाही ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुरू झाली आहे. म्हस्केंच्या बंडखोरीमुळे ठाकरेंच्या नगरसेवकांची संख्या 65 वरुन 64 वर आली आहे. आता ठाकरे बंधूंचे महापालिकेमध्ये एकूण 70 नगरसेवक आहेत.
प्रभाग 157 मधून निवडून आलेल्या डॉ. सरिता म्हस्के या शिंदे गटाच्या गळाला लागल्याची माहिती आहे. आजच्या सेना भवनातील बैठकीला डॉ सरिता म्हस्के गैरहजर असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच गट नोंदणी करण्यासाठी शिवसेना ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्व नगरसेवक नवी मुंबईला रवाना झाले त्यावेळीही सरिता म्हस्के गैरहजर होत्या.








