मुंबई, दि.२३: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी बुधवारी गुढीपाडवा मेळावादरम्यान माहीम भागातील समुद्रात अनधिकृत बांधकाम झाल्याचं म्हणत एक व्हिडीओ दाखवला होता. तसेच हे बांधकाम एका महिन्यात न हटवल्यास त्याठिकाणी गणपती मंदीर बांधू, असा इशाराही त्यांनी दिला होता. राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हे बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, याप्रकरणी आता कारवाई करण्यात आली असून महापालिकेकडून हे बांधकाम पाडण्यास सुरुवात झाली आहे.
राज ठाकरे यांनी दिला होता इशारा | MNS Raj Thackeray
तत्पूर्वी राज ठाकरेंच्या या इशाऱ्यानंतर निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी (मुंबई शहर) हे बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. यासाठी सहा अधिकाऱ्यांचं एक पथक नियुक्त करण्यात आलं होतं. त्यानुसार आज सकाळपासून हे अतिक्रमण हटवण्याचं काम सुरू झालं आहे. यासाठी कर्मचाऱ्यांचं पथक माहीम दर्गाच्या ठिकाणी पोहोचलं असल्याची माहिती वृत्तवाहिनीने दिली आहे. तसेच या ठिकाणी मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर झालेल्या जाहीर माहीम भागातील समुद्रात अनाधिकृत दर्गा बांधण्यात आला दावा केला होता. तसेच त्यांनी भर सभेत या जागेचा व्हिडीओ दाखवत या बांधकामाकडे प्रशासनाचे लक्ष वेधलं होते. तसेच महिन्याभरात हे बांधकाम हटवले नाही, तर त्याच्या शेजारीच गणपतीचे भव्य मंदिर बांधू असा इशाराही त्यांनी दिला होता.