राजकीय घडामोडींवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे ट्विट, चर्चांना उधाण

0

मुंबई,दि.10: महाराष्ट्रात घडणाऱ्या राजकीय घडामोडींवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट केले आहे. यांनतर चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा केला. यांनतर निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव व धनुष्यबाण चिन्ह गोठवले. एकनाथ शिंदे यांच्या बरोबर शिवसेनेचे 40 आमदार व 12 खासदार आहेत. तसेच अनेक पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेनेच्या अंतर्गत वादामुळे पक्षाला नाव व चिन्ह बदलावे लागणार आहे.

शिवसेना पक्षावर आज खूप मोठं संकट कोसळलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यापासून शिवसेनेबद्दल गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने नकारात्मक बातम्या येत आहेत. शिवसेनेच्या 40 आमदार आणि 12 खासदारांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात बंडखोरी केली आहे. या बंडखोरीमुळे शिवसेना पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. विशेष म्हणजे अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पोटनिवडणुकीत शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह वापरण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आहे.

खरंतर हा आदेश शिंदे गटासाठीदेखील आहे. दोन्ही गटाला या निवडणुकीत नवं नाव आणि चिन्हाची निवड करुन पोटनिवडणुकीला सामोरं जायचं आहे. विशेष म्हणजे या सगळ्या घडामोडींदरम्यान उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधत आपली भूमिका मांडली. त्यांच्या भूमिकेनंतर राज ठाकरे यांनी ट्विटरवर दिलेल्या प्रतिक्रियेमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 56 वर्षांपूर्वी शिवसेना पक्षाची स्थापना केली. शिवसेना संघटना आणि पक्ष उभं राहण्यासाठी त्यावेळची परिस्थिती देखील तितकीच महत्त्वाची होती. बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या या छोट्या संघटनेचं रुपांतर आज महाराष्ट्रातील मोठ्या पक्षाच्या रुपात वटवृक्षासारखं झालं होतं. पण अचानक शिंदे गटाने बंडखोरी केल्याने शिवसेना पक्षाची प्रचंड मोठी हानी झाली आहे.

उद्धव ठाकरे यांचे अतिशय जवळचे निकटवर्तीय असलेली अनेक माणसं त्यांच्यापासून दूर गेली. या संकट काळात ठाकरे कुटुंबातील अनेक सदस्यांनी ठाकरेंकडे पाठ फिरवली आहे. उद्धव ठाकरे यांचे सख्खे बंधू जयदेव ठाकरे, त्यांच्या पत्नी स्मिता ठाकरे, मोठे दिवंगत बंधू बिंदूमाधव ठाकरेंचे पुत्र निहार ठाकरे यांनी शिंदेंना पाठिंबा दर्शवला आहे.

या सगळ्या घडामोडींदरम्यान ठाकरे कुटुंबीयदेखील आपल्याचसोबत आहेत, असं चित्र निर्माण करण्यात एकनाथ शिंदे यशस्वी झाले आहेत. पण नियतीने कदाचित वेगळंच काहीतरी लिहिलं असेल तर? कारण उद्धव ठाकरे यांचे चुलत भाऊ, महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या नेत्यांपैकी एक असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज एक वेगळं ट्विट केलं आहे. त्यांनी केलेल्या एका ट्विटमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांनी आपल्या पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसाठी सर्वात मोलाचा सल्ला दिला आहे.

सध्याच्या राजकीय घडामोडींवर सोशल मीडिया किंवा प्रसारमाध्यमांवर कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये, असं राज ठाकरे यांनी स्पष्टच सांगितलं आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या मनात नेमकं आहे तरी काय? असा प्रश्न उपस्थित होतोय. या संकटकाळात आपल्या मोठ्या भावाच्या मदतीला धाऊन जायचं का? अशा विचारात राज ठाकरे असू शकतात. पण उद्धव ठाकरे यांच्याकडून तशी मदतीसाठी साद घातली जाण्याची शक्यता फार कमी आहे, अशी देखील चर्चा आहे. दुसरीकडे दोन्ही बंधू एकत्र यावेत अशी महाराष्ट्रातील लाखो नागरिकांचीसुद्धा इच्छा आहे. याबाबत नेहमी आणि वेळोवेळी चर्चा होत आली आहे. पण वास्तव्यात तसं काहीच आतापर्यंत घडलेलं नाही.

शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचा आत्माच आहे. बाळासाहेबांनी शिवसेनेला जन्म दिला. लाखो शिवसैनिकाला या माध्यमातून एकत्र जोडलं. अनेकांना मोठं केलं. राज ठाकरे हे लहानपणापासून बाळासाहेब ठाकरेंच्या राजकीय तालमीत मोठे झाले. त्यांच्याकडूनच त्यांनी राजकारणाचं बाळकडू घेतलं. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवलं जाणं हे राज ठाकरे यांनादेखील अस्वस्थ करणारं असू शकतं. उद्धव ठाकरे एकदा रुग्णालयात दाखल असताना राज ठाकरे यांनी त्यांच्या गाडीची स्टेअरिंग हातात घेतलेलं हे संबंध महाराष्ट्राने पाहिलं होतं. त्यामुळे या संकट काळात राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या मदतीला जातात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here