मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे केली ही मागणी

0

मुंबई,दि.९: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे मोठी मागणी केली आहे. केंद्र सरकारने काँग्रेस नेते माजी पंतप्रधान नरसिंह राव, चौधरी चरणसिंग आणि शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांना भारतरत्न (मरणोत्तर) देण्याची घोषणा केली आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी X वर पोस्ट करून ही माहिती दिली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी X वर पोस्ट करत स्व. बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी केली आहे. राज ठाकरे म्हणाले, ‘माजी पंतप्रधान स्व. पी.व्ही. नरसिंहराव, स्व. चौधरी चरण सिंग आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक एस.स्वामिनाथन ह्यांना भारतरत्न सन्मान घोषित करण्यात आला. ह्या यादीतले एस.स्वामिनाथन ह्यांचं अवघ्या काही महिन्यांपूर्वी निधन झालं. इतकी अफाट कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञाला त्यांच्या हयातीत हा बहुमान मिळायला हवा होता. असो.’

ठाकरे यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘बाकी पी.व्ही नरसिंहराव आणि चौधरी चरण सिंग ह्यांना आणि काही वर्षांपूर्वी प्रणब मुखर्जींना भारतरत्न सन्मान घोषित करून, केंद्रातील भारतीय जनता पक्ष प्रणित सरकारने राजकीय औदार्य दाखवलंच आहे तर मग हेच औदार्य त्यांनी हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांना देखील भारतरत्न घोषित करून दाखवायलाच हवं.’

‘देशातील प्रख्यात व्यंगचित्रकार आणि देशभरातील तमाम हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या अद्वितीय नेत्याला हा सन्मान मिळायलाच हवा. स्व. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा ज्यांच्याकडे आलाय अशा माझ्यासारख्या अनेकांसाठी तो अत्यानंदाचा क्षण असेल.’ असे ठाकरे यांनी म्हटले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here