मुंबई,दि.२४: Ind Vs PaK T20 World Cup: भारताने पाकिस्तानवर थरारक विजय मिळवला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ट्विट करत टीमचे अभिनंदन केले आहे. भारतानं अखेरच्या ओव्हरच्या अखेरच्या बॉलवर विजयी लक्ष्य गाठलं आणि खऱ्या अर्थानं मेलबर्नमध्ये दिवाळी साजरी केली. विराट कोहलीची ‘विराट’ इनिंग आणि त्यानं हार्दिक पंड्यासोबत केलेली शतकी भागीदारी याच्या जोरावर भारतीय संघानं पाकिस्तानविरुद्धच्या महामुकाबल्यात 4 विकेट्सनी सनसनाटी विजय मिळवला. अखेरच्या बॉलपर्यंत रंगलेल्या या सामन्यात अखेर टीम इंडियाची सरशी झाली. नाबाद 82 धावा करणारा विराट कोहली भारताच्या या विजयाचा खऱ्या अर्थानं नायक ठरला.
मेलबर्न येथे झालेल्या या सामन्यात अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्या यांच्या भेदक गोलंदाजीनंतर, विराट आणि पांड्या यांची शतकी भागीदारी भारताच्या विजयात निर्णायक ठरली. टीम इंडियाच्या या विजयानंतर देशभरात जोरदार जल्लोष सुरू आहे. यातच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी या विजयानंतर भारतीय संघाचे कौतुक केले असून पुढील सामन्यांसाठीही संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.
“पाकिस्तानच्या विरुद्ध भारताने आज मिळवलेला विजय हा अविस्मरणीय आहे! भारतीय संघाने शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देत जो विजय मिळवला त्याला तोड नाही. येणाऱ्या सगळ्या सामन्यांसाठी भारतीय संघाला शुभेच्छा,” असे ट्विट राज ठाकरे यांनी केले आहे.
या सुपर इनिंगनंतर आता किंग कोहलीवर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला टीम इंडियाला भारतीयांना मोठी भेट दिल्याचे म्हणत अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केले आहेत. अशातच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने कोहलीच्या कौतुकाची एक खास पोस्ट केली आहे.
विराट कोहलीसाठी सचिनने लिहिले की, “विराट, ही तुझ्या आयुष्यातील सर्वोत्तम खेळी होती. तुला खेळताना पाहणे हे सर्वात आनंददायक होते, रौफविरुद्ध 19 व्या षटकात लाँग ऑनवर बॅकफूटवर मारलेला षटकार नेहमी लक्षात राहील.” विराटने 19 व्या षटकात अत्यंत महत्त्वाच्या वेळी दोन षटकार लगावत भारताची बाजू वर उचलून धरली होती, तर शेवटच्या षटकात अत्यंत हुशारीने खेळून विराटने नाबाद राहून टीम इंडियाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.