हिंदुस्थानचं राजकारण कधीच राजकीय सूडबुद्धीने पेटलेलं नव्हतं पण, आज…?

0

मुंबई,दि.२५: सध्या केंद्रात आणि राज्यात भाजपा आघाडीचे सरकार आहे. देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरातून त्यांना अभिवादन केलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि इतर सर्व नेत्यांनी अटलबिहारी वाजपेयींना आदरांजली वाहिली. दिल्लीतील सदैव अटल समाधी स्थळावर केंद्रीय मंत्री, भाजप नेते आणि एनडीए नेत्यांनी उपस्थिती दर्शवली. देशाच्या जडणघडणीत अटबिहारी यांचं मोठं योगदान आहे. आज त्यांची ९९ वी जयंती साजरी होत आहे. त्यानिमित्ताने सोशल मीडियातूनही त्यांना आदरांजली वाहिली जात आहे.

सध्या केंद्रात आणि राज्यात भाजपा आघाडीचे सरकार आहे. विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात ससंदेत विरोधी पक्षांच्या तब्बल १४१ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यावरुन, केंद्रातील मोदी सरकारवर टीका होत आहे. आज अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी मनसेनं अटलबिहारी वाजपेयी यांचा संसदेतील एक व्हिडिओ शेअर करत त्यांच्या आणि तत्कालीन सरकारच्या कामकाजाची पद्धत सांगितली आहे. सरकार येईल, आणि जाईल. पक्ष बनतील आणि बिघडतील, पण हा देश राहिला पाहिजे, या देशातील लोकशाही राहिली पाहिजे, असे अटलबिहारी वाजपेयी या व्हिडिओत म्हणताना दिसून येत आहे.

तत्कालीन पी.व्ही. नरसिंग राव यांच्या सरकारमध्ये विरोधी पक्षातील नेते असतानाही अटबिहारी वाजपेयी यांना भारताचे प्रतिनिधी म्हणून जेनिव्हा येथे पाठवण्यात आले होते. त्यावेळी, पाकिस्तानी आश्चर्यचकीत झाले होते, अशी आठवण वाजपेयी यांनी सांगितली होती, हे सांगतानाच त्यांनी देशात सत्ताधारी आणि विरोधकांमधील हा दुवा कायम राहिला पाहिजे, असे म्हटले होते. त्यावरुन, मनसेनं विद्यमान मोदी सरकारला लक्ष्य केल्याचं दिसून येत आहे.  

सत्ताधीश कुणीही असो पण आजमितीला किंचितही विरोधी आवाज सत्ताधाऱ्यांना सहन होत नाही. पण, हि अटलवाणी ऐकलीत तर कळेल कि, हिंदुस्थानचं राजकारण कधीच राजकीय सूडबुद्धीने पेटलेलं नव्हतं पण, आज…? असा प्रश्न मनसेनं विचारलं आहे. मनसेनं अप्रत्यक्षपणे मोदी सरकारवरच हल्लाबोल केला आहे.

तसेच, राजकीय कारकिर्दीचा मोठा काळ विरोधात असतानाही सत्तेच्या मोहापायी संयम न सोडणाऱ्या अटलजींच्या जयंतीला इतकीच प्रार्थना कि पुन्हा ह्या देशात विचारांचं, विवेकाचं, तात्विक विरोधाचं राजकारण रुजो, लोकशाही खऱ्या अर्थाने बळकट होवो, असेही मनसेनं अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना म्हटलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here