आमदार रोहित पवारांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट

0

मतदारसंघातील अनेक रस्त्यांची कामे लागणार मार्गी

नवी दिल्ली,दि.१६ : कर्जत – जामखेडच्या विकासासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवानेते आमदार रोहित पवार नेहमीच कार्यरत आहेत. मतदारसंघातील नागरिकांसाठी सर्व सुविधांची पूर्तता करण्यासाठी केंद्र, राज्य पातळीवर तत्परतेने पाठपुरावा करून ते प्रगतीचा नवा आयाम स्थापित करत आहेतच शिवाय मतदारसंघातील पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात निर्माण आणि नुतनीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून घेत आहेत.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी (ता. १४) भेट घेऊन कोरोना महामारी काळात १३ हजार कि.मी. चे रस्ते निर्माणाचे कार्य करून नवा विक्रम केल्याबद्दल अभिनंदन केले. मतदारसंघातून जाणारा पैठण ते पंढरपूर या पालखी मार्गाचे खर्डा ते कुर्डूवाडी यादरम्यान रखडलेले ११४ कि. मी चे काम जलदगतीने सुरु करणे आवश्यक आहे. संत एकनाथ महाराज, संत भगवान बाबा, संत गीतेबाबा, संत गोरोबा कुंभार यांसारख्या प्रख्यात संतांच्या पालख्या आणि लाखो यात्रेकरूंसह अनेक दिंड्या या मार्गाने पंढरपूरला जात असतात. खर्डा गावापर्यंतच्या मार्गाचे काम आधीच प्रगतीपथावर आहे, मात्र खर्डा ते कुर्डुवाडी पर्यंतचा पुढील भाग अद्याप प्रलंबित आहे. त्यासाठी पुरेसा निधी देण्याची मागणी यावेळी आमदार रोहित पवार यांनी गडकरी यांच्याकडे केली.

सोबतच मतदारसंघातील श्रीगोंदा आणि जामखेड येथून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ ड याचे पुनर्निर्माण आणि नुतनीकरण करण्यासंदर्भात आणि अहमदनगर- सोलापूर यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग ५१६ अ या रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली होती. करमाळा मतदारसंघातील जातेगाव ते टेंभुर्णी हा रस्ता NHAI कडे हस्तांतरित करण्यासाठी आ. संजय मामा शिंदे यासाठी प्रयत्न करत असून करमाळ्याच्या वतीने आमदार रोहित यांनीही पाठपुरावा केला आहे. याबाबत शरद पवार आणि अजित पवार यांनीही यासाठी नितीन गडकरी साहेब यांच्याशी चर्चा करून काम पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केले होते. कामाला मंजुरी मिळाली असून या रस्त्यांच्या कामाच्या निविदा पूर्ण झाल्या आहेत. यासाठी नितीन गडकरी यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आणि या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन करण्यासाठी वेळ देण्याची विनंती आमदार रोहित पवार यांनी यावेळी केली. केंद्रीय रस्ते निधी (CRF) अंतर्गत काही निधी मतदारसंघासाठी मिळावा यासाठी आ. रोहित पवार यांनी नितीन गडकरी साहेबांशी चर्चा केली. अहमदनगर ते जामखेड, बीड आणि दुर्गम भागातील गावे, जिल्ह्यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग ५६१ चे ५१ किमी अंतराचे काम मागील वर्षी पूर्ण झाले आहे. मात्र साबळखेड – आष्टी – चिंचपूर – जामखेड येथून २० किलोमीटरचा पॅच गेल्या ६ वर्षांपासून रखडला आहे. मुसळधार पावसामुळे या मार्गाची अधिकच दुरवस्था झाली आहे. ज्यावर वाहने चालवणे अशक्य आहे. हा रस्ता मराठवाडा व अहमदनगरला जोडणारा अत्यंत महत्वाचा आहे.

रस्त्यांच्या या कामासाठी पुरेसा निधी देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन यावेळी नितीन गडकरी साहेब यांनी दिल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.

आमदार रोहित पवार दिल्लीमध्ये असता केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र शेखावत यांची भेट घेऊन कर्जत – जामखेड अवर्षण प्रवण क्षेत्रात असल्याने ‘प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना’ किंवा AIBP (Accelerated Irrigation Benefit Programme) या दोन योजनांपैकी एखादी योजना मतदारसंघात लागू करावी, या मागणीसाठी गजेंद्र शेखावत यांची दिल्लीत भेट घेऊन चर्चा केली.

तसेच केंद्रीय दळणवळण, रेल्वे आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन मतदारसंघातील मोबाईल नेटवर्कची समस्या दूर करण्याची विनंती केली. केंद्राने भारताच्या बीपीओ उद्योगाला लहान शहरांमध्ये स्थापन करून समतोल विकास साधावा आणि टपाल खात्याच्या लोकहिताच्या काही योजना कर्जत – जामखेड मतदारसंघात गावपातळीपर्यंत पोचवण्यासाठी केंद्रीय दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्लीत भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य सिंधियाजी यांची दिल्लीत भेट घेऊन खर्डा किल्ल्यात उभारण्यात येणाऱ्या ‘स्वराज्य ध्वजा’च्या कार्यक्रमाचं त्यांना निमंत्रण दिले, दसऱ्याच्या दिवशी गावी कार्यक्रम असल्याने प्रत्यक्ष उपस्थित राहू शकलो नाही तरी व्हिडीओ व अन्य माध्यमातून कार्यक्रमासाठी शुभेच्छा पाठवेल असे ज्योतिरादित्य सिंधियाजी यांनी यावेळी सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here