Amol Mitkari: आमदार अमोल मिटकरी यांचं शिंदे फडणवीस सरकारबाबत मोठं विधान

0

दि.29: राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी शिंदे फडणवीस सरकारबाबत मोठं विधान केलं आहे. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टातील सुनावणीची तारीख अद्याप निश्चित झालेली नसल्याने सत्तापेच कायम आहे. यादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांना मोठं विधान केलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल असं भाकीत अमोल मिटकरी यांनी केलं आहे. बोदवड येथे रोहिणी खडसे यांनी संवाद यात्रेचं आयोजन केलं होतं. यावेळी बोलताना अमोल मिटकरी यांनी भाजपावर जोरदार टीका केली.

“ज्या दिवशी सुप्रीम कोर्टाचा निकाल लागेल, त्या दिवशी 16 आमदार अपात्र ठरतील. त्यानंतर राज्यातील शिंदे-फडणवीसांचं सरकार कोसळेल. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकते,” असा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे.

50 खोके, एकदम ओके

“अधिवेशनाच्या पायऱ्यांवर ५० खोके आणि एकदम ओके असं म्हटलं तर एवढं का लागलं? लहान मुलंदेखील ‘५० खोके एकदम ओके’ म्हणतात. त्या खोक्यांमध्ये बिस्किट, इंजेक्शन असू शकतात. शिंदे गटाचे आमदार म्हणतात आमच्या अंगावर येण्याचा प्रयत्न केला तर शिंगावर घेऊ. मग आता बैलांवर 50 खोके, एकदम ओके लिहिलं,” असा टोला अमोल मिटकरी यांनी लगावला. पान टपरीवर चुना लावणारे गद्दार निघाले अशी टीकाही त्यांनी केली.

अमोल मिटकरी यांनी यावेळी तोतरं बोलत भाजपा नेते किरीट सोमय्यांची खिल्ली उडवली. “प्रताप सरनाईक जेलमध्ये जातील, असं सोमय्या म्हणत होते, पण ते तर शिंदे गटात गेले. यशवंत जाधवही भाजपमाध्ये गेले. भावना गवळींनी तर शिवबंधन काढून मोदींना राखी बांधली,” अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here