बीड,दि.21: ब्राम्हण महासंघाने राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी माफी मागण्याची मागणी केली होती. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी लग्नात म्हटल्या जाणाऱ्या एका मंत्राचा उल्लेख आपल्या भाषणात करुन त्यावर टिप्पणी केल्यामुळं ब्राम्हण समाजाकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाजीराव धर्माधिकारी यांनीही त्यांच्या या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडमधील नेते आणि माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी फेसबुकवर पोस्ट केली असून त्यांची ही पोस्ट सध्या व्हायरलं झाली आहे. यामध्ये त्यांनी हिंदु धर्मात मिटकरींनी उल्लेख केल्याप्रमाणं ‘मम् भार्या समर्पयामी’ असा मंत्र नसतो. पण मिटकरींना आमदारकीसाठी हे तंत्र सापडलेलं असू शकतं. ही जाहीर खिल्ली आहे, असं धर्माधिकारी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसेच मिटकरींना माफी मागावीच लागेल असंही धर्माधिकारी यांनी म्हटलं आहे.
धर्माधिकारी म्हणाले, “चुकीला चूक म्हटलंच पाहिजे. आजकल वाचाळवीरांची नवीन संस्कृती महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे. दोन जातींमध्ये, धर्मांमध्ये कशी फूट पाडायची असा प्रकार चालू आहे. यामुळं तरुण भरकटताय आणि दिशाहिन होत आहेत हा प्रकार मला चुकीचा वाटतो. मिटकरी तर आत्ता दोन वर्षात पक्षात आलेले आहेत. केवळ भाषणामुळं कोणाला विधानपरिषद सदस्यात्व द्यावं हा निकषच चुकतोय. कारण हे मानधन घेऊन भाषणं करणारे लोक आहेत. यांची जर टर्म संपली आणि भाजपमध्ये गेले तर ते राष्ट्रवादीच्या नेत्यांवर अशीच मिमिक्री करुन हशा आणि टाळ्या घेतील असा मला विश्वास वाटतो. माझं धनंजय मुंडे आणि प्रांत अध्यक्षांशीही बोलणं झालं आहे. माफीतर मिटकरींना मागावीच लागेल”