जालना,दि.26: मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. 10 फेब्रुवारीपासून मनोज जरांगे उपोषण करत होते. मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण स्थगित केले आहे. अंतरवाली सराटीत साखळी उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती जरांगे पाटील यांनी दिली. डॅाक्टरांच्या सल्ल्याने जरांगे उपचार घेणार आहेत.
मराठ्यांचा अंत बघू नका, लोकशाही मार्गाने आमचे आंदोलन सुरू आहे. असे मनोज जरांगे म्हणाले. काल (दि.25) मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले होते. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. मनोज जरांगे पाटील यांनी रात्री भांबेरी गावात तळ ठोकला होता. त्यानंतर भांबेरी गावात पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा अंतरवाली सराटीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.
मनोज जरांगे यांनी महिलांच्या हातून पाणी पिऊन उपोषण सोडले. मनोज जरांगे आपली पुढची भूमिका स्पष्ट केली आहेत. लोकांना त्रास होऊ नये म्हणून मागे आलोय. लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. कुणीही कितीही दबाव आणला तरी मागे हटणार नाही असं जरांगेंनी म्हटलं.
देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा अंतरवाली सराटी सारखी लाठीचार्जची घटना घडवून आणायची होती. त्यांना राज्यात दंगल घडवायची होती. पण मी तसं होण्यापासून वाचवलं, असा मोठा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. शिंदे, फडणवीसांनी मराठ्यांची नाराजी ओढावून घेऊ नये…मराठ्यांची नाराजी शिंदे, फडणवीसांना परवडणार नाही असा इशारा जरांगेंनी दिला आहे.