जालना,दि.27: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी माफी मागितली आहे. त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची माफी मागितली आहे. रविवारी (दि.25) मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवराळ भाषेत टीका केली होती. जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. भाजपा आमदारांनी जरांगे पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.
भाजपा आमदार आशिष शेलार विधानसभेत म्हणाले मनोज जरांगे यांनी एकेरी उल्लेख करत फडणवीस यांच्यावर टीका केली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चॅलेंज केले. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या विधानांवरुन विशेष समितीच्या माध्यमातून चौकशी करण्याचे आदेश विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिले आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी मागितली माफी
मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना आई-बहिणीचा उल्लेख केल्याने दिलगिरी व्यक्त केली आहे. तसंच सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी केल्याशिवाय मागे हटणार नाही. त्यांना काय चौकशी करायच्या आहेत त्या ते करु शकतात असंही ते म्हणाले आहेत. ZEE 24 ने याबाबत वृत्त दिले आहे.

ZEE 24 ने दिलेल्या वृत्तानुसार मनोज जरांगे पाटील म्हणाले, “विधानसभेत देवेंद्र फडणवीसांनी माझ्या विधानावर भाष्य करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला दिला. छत्रपतींचे विचार सोडता का? असं त्यांनी मला विचारलं आहे. माझ्याकडून अनावधानाने ते शब्द वापरले गेले. माझ्या तोंडून आई-बहिणीचा उल्लेख झाला असेल तर ते मागे घेतो आणि दिलगिरी व्यक्त करतो. कारण आई-बहिणीसाठी दिलगिरी व्यक्त करण्यात कमीपणा नाही. मीदेखील छत्रपतींचे विचार मानतो.”
यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीकाही केली. “नेटवर्क बंद करणं, लोकांमध्ये वातावरण निर्माण करणं ही सगळी देवेंद्र फडणवीसांची किमया होती. पण मी राज्यात अशांतता निर्माण होऊन देणार नाही. त्यांचा डाव हाणून पाडणार. शांततेत आंदोलन करणार. कायमस्वरुपी सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी होईपर्यंत मी मागे हटणार नाही. तोपर्यंत त्यांना काय चौकशा करायची ती करु देत”, असं आव्हानच त्यांनी दिलं.
तेव्हा वाईट वाटलं नाही का?
“आमच्या आया-बहिणीच्या छाताडवर नाचलात, गोळ्या घातल्या तेव्हा वाईट वाटलं नाही का? आणि आज वाईट वाटत आहे. आमच्या आई-बहिणीच्या मुंडक्यावर पाय दिला आणि वरुन हाणलं. 20 पोलीस एका महिलेला मारहाण करत होते. उचलून आपटता का, विटा डोक्यात हाणता त्याच्या. तुमची आई म्हटलं तर किती लागलं. आमच्या आया-बहिणी उभ्या चिरल्यात तेव्हा कुठे गेला होता एसआटी नेमणारा?”. असे मनोज जरांगे म्हणाले.