मुंबई,दि.२९: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुंबईत आंदोलन सुरू केले आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांना एका दिवसाच्या आंदोलनाची परवानगी देण्यात आली आहे. मुंबईकरांना त्रास झाला नाही पाहिजे ही आपली जबाबदारी आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे-पाटील हे आझाद मैदानात दाखल झाले आहेत. १० वाजल्यापासून मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरु करण्यात आलं आहे. हजारो मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या समर्थनासाठी आझाद मैदानात दाखल झाले आहेत.
गडबड गोंधळ करू नका, लोकांचे ऐका आपल्या समाजाचे 70 वर्ष वाटूळे झाले हे एकाही मराठ्याने विसरू नये, असे मनोज जरांगे यांनी म्हटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी बोलताना यापूर्वीच 10 टक्के आरक्षण दिलं आहे, आंदोलन करणाऱ्यांनी अभ्यास करुन मागणी करावी, असं म्हटलं होतं.
जे शांततेत आंदोलन करील तोच आपला कार्यकर्ता, सरकारचा कार्यकर्ता जर आला, किंवा कोण्या पक्षाचे असाल मराठ्यांना डाग लावत असाल तर तुमची जबाबदारी आमची नाही. मला तळतळायला लावू नका, याच्यानंतर मला बोलायला लावू नका असे मनोज जरांगे म्हणाले.