Uddhav Thackeray | माझे वडील हवेत पण मुलगा नको, मी काय वाईट केल तुमच्यासोबत: उद्धव ठाकरे

0

मुंबई,दि.१९: Uddhav Thackeray On Politics: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देत शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. हा उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मोठा धक्का मानला जातोय. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाकडून भाजपसह शिंदे गटावर चौफेर टीका केली जात आहे.

निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत मोठा निकाल दिला. या निकालाने उद्धव ठाकरे आणि ठाकरे समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. या निर्णयानंतर शिंदे गट आणि भाजपकडून विविध प्रतिक्रिया आल्या. त्यावरुन आता स्वतः उद्धव ठाकरेंनी भाजप आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

मोगॅम्बो खुश हुआ | Uddhav Thackeray

ठाकरे म्हणाले की, ‘काल अमित शहा पुण्यात आले होते, त्यांनी विचारलं महाराष्ट्रात कसं काय सुरू आहे. त्यानंतर ते म्हणाले आज खूपच चांगला दिवस आहे. कारण शिवसेनेचे नाव आणि चिन्ह आपल्यासोबत आहे. मोगॅम्बो खुश हुआ,’ अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. तसेच, ‘मिस्टर इंडिया चित्रपट आठवला तर त्यात मोगॅम्बोला हेच हवे होते. देशात आपापसात लढाई व्हावी, लोक आपसात लढत राहिले, तर मी राज्य करेन. आजचे मोगॅम्बो हेच तर आहेत,’ अशी टीकाही ठाकरेंनी केली. 

मी काय वाईट केले तुमच्यासोबत? | Uddhav Thackeray On Politics

ठाकरे पुढे म्हणाले, ‘काल मोगॅम्बो म्हणाले आम्ही पाय चाटले, गद्दार त्यांचे काय चाटताहेत माहिती नाही. बोहरा समाजाने बोलावले मी गेलो, दिखावा नाही केला, पोळ्या नाही लाटल्या. मला प्रेमाने बोलावले, मी गेलो कारण आमचे जुने संबंध आहेत. मुफ्ती मोहम्मद सोबत गेले तेव्हा कुठे गेले होते हिंदुत्व. ज्यांना जायचे ते जाऊ शकतात, पण त्यांनी इतर पक्षात जायला हवे होते. शिवसैनिकांनी घाम गाळून त्यांना मोठ केले, तेच आज मालक बनायला बघताहेत. माझे वडील हवेत पण मुलगा नको, मी काय वाईट केल तुमच्यासोबत?’ असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी केला.

मला मुख्यमंत्री व्हायचेच नव्हते पण पवार साहेब म्हणाले…

तसेच, ‘मी भाजपला मुख्यमंत्री पद मागितले. मला मुख्यमंत्री व्हायचेच नव्हते पण पवार साहेब म्हणाले. भाजपने अडीच वर्षांचे वचन पूर्ण केले असते तर आज हे सगळ करायची गरज नव्हती. मी काँग्रेससोबत गेलो नाही, तर भाजपने मला ढकललं आहे. मला हे यासाठी सांगायचं आहे की, तुमच्या मनात कोणताही गैरसमज राहू नये. 2014 मध्ये मी युती तोडली नव्हती, भाजपने युती तोडली होती. तेव्हाही मी हिंदू होतो, आजही मी हिंदू आहे. त्यावेळी तुम्ही युती तोडली, नंतर शेवटी त्यांना आमची गरज लागली. भाजपला वाटलं होतं ते स्वतःच्या दमावर सत्ता सांभाळतील, मात्र त्यांना ते जमलं नाही, शेवटी आमची मदत घ्यावी लागली,’ असा टोलाही त्यांनी लगावला. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here