Sharad Pawar: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर शरद पवार म्हणाले…

Sharad Pawar: नुकताच झालेल्या निवडणूक निकालांवरही शरद पवारांनी भाष्य केलं

0

बारामती,दि.४: Sharad Pawar: निवडणूक आयुक्त नेमणूक प्रक्रियाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांबद्दल मोठा निर्णय दिला आहे. केंद्र सरकारच्या द्वारे निवडणूक आयुक्तांची निवड केली जात होती. ही प्रक्रिया चुकीचे असल्याचे ठरवले आहे. निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीची प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाने बदलली आहे.

निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तींसंदर्भात गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला. मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांची नेमणूक पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांचा समावेश असलेल्या समितीच्या शिफारशीनुसार राष्ट्रपतींनी करावी, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. न्यायालयाच्या या निर्णयाचं जवळपास सर्वच राजकीय पक्षांकडून स्वागत करण्यात आलं. दरम्यान, यासंदर्भात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. ते बारामतीत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी नुकताच झालेल्या निवडणूक निकालांवरही भाष्य केलं.

शरद पवार काय म्हणाले? | Sharad Pawar

“निवडणूक आयोगासंबंधी काही शंका राजकीय पक्षांनी उपस्थित केल्या होत्या. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रक्रियेत बदल केला आहे. निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीच्या प्रक्रियेत आता पंतप्रधान, सरन्यायाधीश आणि विरोधी पक्षनेत्याचा समावेश असणार आहे. हा संसदीय लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय चांगला निर्णय आहे”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

पोटनिवडणुकीबाबतही म्हणाले…

यावेळी बोलताना त्यांनी देशात नुकताच झाल्या तीन राज्यांच्या निवडणुका आणि पुण्यातील पोटनिवडणुकीबाबतही प्रतिक्रिया दिली. “देशात आता सरकार बदलण्याचा मूड तयार होतो आहे. तीन राज्यांच्या निवडणुका, पुण्यातील पोटनिवडणूक, काही दिवसांपूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, विधानपरिषद निवडणूक, या निवडणुकांचे निकाल हेच सांगत आहेत”, असेही ते म्हणाले.

…यावरून देशात बदलाचे वारे वाहू लागल्याचं दिसून येते

“एकंदरीत देशाचं चित्र बघितलं तर आज केरळ, तामिळनाडू मध्ये भाजपा नाही. आगामी काळात निवडून येण्याची शक्यताही नाही. कर्नाटकमध्ये आधी काँग्रेसचं सरकार होतं. पण आमदार-खासदार फोडून तिथे भाजपाने सत्ता स्थापन केली. त्यामुळे आगामी निवडणुकीत लोक मतदान करताना, याचा विचार नक्की करतील. त्यानंतर दिल्ली आणि पंजाबमध्येही भाजपा नाही. पश्चिम बंगाल आणि हिमाचलमध्येही भाजपा नाही. यावरून देशात बदलाचे वारे वाहू लागल्याचं दिसून येते”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

नागालॅंडच्या जनतेचे मानले आभार

पुढे बोलताना, नागालॅंडच्या जनतेचे आभार मानले. नागालॅंडमध्ये राष्ट्रवादीला चांगलं यश मिळालं आहे. आम्हाला मिळालेल्या मतांची टक्केवारीही चांगली आहे. यासाठी मी नागालॅंडच्या नागरिकांचे आभार मानतो, असे ते म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here