मुंबई,दि.25: Loudspeaker controversy: महराष्ट्रात लाऊड स्पीकरवरून वाद सुरु आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भोंगे हा धार्मिक नसून सामाजिक विषय आहे, असे म्हणत 3 मे पर्यंत मशिदीवरील भोंगे काढले पाहिजेत अशी मागणी केली. मशिदीवरील भोंगे हटवण्याच्या मागणीमुळे राज्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर (Loudspeaker controversy) आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीवर भाजपने बहिष्कार घातला. तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे बैठकीसाठी आपल्या पक्षाचे प्रतिनिधी पाठवले.
या बैठकीत विविध नेत्यांशी चर्चा केल्यानंतर गृहमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. ‘भोंग्यांबाबतचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला असल्याने तो संपूर्ण देशासाठी लागू आहे. त्यामुळे याबाबत केंद्र सरकारने काही नियम केले आणि ते सर्वच राज्यांसाठी लागू केले तर राज्या-राज्यांमध्ये वेगळी परिस्थिती निर्माण होणार नाही. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळ घेऊन केंद्र सरकारशी चर्चा करावी, अशी आमची भूमिका आहे,’ असं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे. ही भूमिका घेऊन गृहमंत्र्यांनी हा प्रश्न केंद्राकडे टोलवल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.
‘काही राजकीय पक्षांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेत डेडलाइनची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर आम्ही आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला अनेक नेते उपस्थित होते. मात्र भाजप नेते उपस्थितीत राहू शकले नाहीत. बैठकीत विविध मुद्द्यांवर साधक-बाधक चर्चा झाली. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य सरकारने सर्व प्रकारचे प्रयत्न करावेत, अशा मतापर्यंत आम्ही आलो आहोत,’ अशी माहिती गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिली आहे.
राज्यात अनेक ठिकाणी जत्रा, भजने आणि काकड आरत्या सुरु असतात. त्यामुळे सरसकट लाऊडस्पीकर काढण्याची कारवाई करण्यास अवघड होईल याकडे त्यांनी लक्ष वेधले. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस काम करत आहेत. सुप्रीम कोर्टाचा निर्णय असल्याने देशाला हा निर्णय लागू असल्याचेही त्यांनी सांगितले.
मनसे 3 मेच्या अल्टिमेटमवर ठाम
मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याऐवजी पक्षाचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे यांनी बैठकीत हजेरी लावली. मनसे आपल्या भूमिकेवर ठाम असून 3 मेचा अल्टिमेटम कायम असल्याचे बाळा नांदगावकर यांनी सांगितले.