Jitendra Awhad: माझे बाबा अरूण गवळी यांच्या वडिलांच्या दारूच्या अड्ड्यावर काम करत: जितेंद्र आव्हाड

0

ठाणे, दि.१४: Jitendra Awhad: परिस्थितीमुळे आपले वडील लहानपणापासून काम करत होते. माझे वडील अरुण गवळी (Arun Gawli) यांच्या दारूच्या अड्ड्यावर काम करायचे असे राष्ट्रवादीचे नेते मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) असे वक्तव्य केले. लहानपणी घरच्यांना मदत व्हावी म्हणून माझे बाबा अरूण गवळी (Arun Gawli) यांच्या वडिलांच्या दारूच्या अड्ड्यावर काम करत असत. दुसऱ्यांना पैसे मोजायला देण्यापेक्षा या लहान मुलाला पैसे मोजायला सांगितले तर गल्ला कितीचा होतो, हे समजेल, असे अरुण गवळी यांच्या वडिलांना वाटले असेल. त्यामुळेच त्यांनी माझ्या वडिलांना पैसे मोजण्याच्या कामावर ठेवले होते, असे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सांगितले. ते रविवारी ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या ओबीसी राज्यस्तरीय शिबिरात बोलत होते.

कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांनी राज्यातील ओबीसी समाजाला साद घालताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. माझा कोणताही राजकीय हेतू नसून ओबीसीची ताकद राजकारण्यांना कळली नाही तर ते आपणाला गृहीत धरतील. कोणीही ओबीसींना गृहीत धरू नये, यासाठी तुम्ही एक व्हा. जर बिहार आणि उत्तरप्रदेशमधील मुख्यमंत्री ओबीसी ठरवू शकतो. तर महाराष्ट्रमधील मुख्यमंत्री ओबीसी का ठरवू शकत नाही, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.

मी स्वतः ओबीसी असून मी कधीही ओबीसीचे राजकारण केले नाही. पण तुम्ही आमचे सर्व काढून घ्यायला लागल्यावर गरिबांसाठी लढले पाहिजे. राज्यात डोक्यावरती छप्पर नसलेले सर्वांत जास्त ओबीसी आणि भटके विमुक्त असल्याचे सांगत आपल्या अस्तित्वाची लढाईच आपण लढत नाही. मी ज्या सोसायटीमध्ये राहत होतो, त्या सोसायटीच्या सत्यनारायणाच्या पूजेला माझ्या आईला कधीच बोलवले नाही, हे आम्ही कसे काय विसरू शकतो. ओबीसी समाजाला लढायची सवय नसल्याचेही आव्हाड यांनी म्हटले.

ओबीसींनी केलेली प्रगती अनेकांच्या डोळ्यात सलतेय

सर्व सरकारी कंपन्या बंद होऊ लागल्याने आरक्षण राहिले कोठे, असाही प्रश्न आव्हाड यांनी यावेळी उपस्थित केला. आरक्षण काढल्यानंतर देशात ११ लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या असून ओबीसींचे आरक्षण कसे काढून घेतले, हेच आपणाला कळले नाही, असेही ते म्हणाले. गेल्या २० वर्षांत मंडल आयोगाच्या प्रयोगामुळे शिक्षणामध्ये ओबीसींनी चांगली प्रगती केली. ही प्रगती काहींच्या डोळ्यात सलत होती.

कालपर्यंत आमच्या घरात धुणीभांडी करणाऱ्यांचा मुलगा इंजिनीअर होऊन अमेरिकेत जातोय. हे शल्य काही जणांना बोचत होते. त्याचा परिणाम काय झाला, हे सर्वांना माहीत असल्याचे आव्हाड म्हणाले. राज्यात ३५४ जाती असून या जातींपैकी आरक्षणाचा लाभ घेतलेल्या केवळ १६ ते १७ जाती आहेत. आजही सगळ्या जाती दऱ्या-खोऱ्यांत, पाडे आणि वस्त्यांवर राहतात. त्यांची आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक प्रगती करण्याची गरज असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here