Jalna Lathi Charge: पोलिसांवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप, मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल

0

जालना,दि.२: Jalna Lathi Charge: पोलिसांवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप करत मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू असताना जमलेल्या गर्दीच्या ठिकाणी पोलिसांवर झालेल्या दगडफेकप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. १६ जणांसह अन्य ३०० ते ३५० नावे माहीत नसलेल्या आंदोलनकर्त्यांविरुद्ध गोंदी पोलिसांनी हा गुन्हा नोंदविला आहे.

जालना मराठा आंदोलन | Jalna Lathi Charge

मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसले असताना प्रकृती खालावल्याने त्यांना उपचाराची आवश्यकता असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुचविले होते. त्यामुळे त्यांना समजावून सांगण्यासाठी पोलीस अधिकारी गेले होते. परंतु आरक्षण मिळाल्याशिवाय जरंगे यांना उपोषण सोडू देणार नाही असे सांगून आंदोलनकर्त्यांनी पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार आणि महसूल अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली.

पोलीस आणि दंडाधिकारी यांनी दिलेल्या कायदेशीर सूचनांचे पालन केले नाही. पोलिसांवर दगडफेक व प्राणघातक हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक केली तसेच त्यांचे खासगी वाहन पेटवून नुकसान केले, असे या संदर्भात दाखल केलेल्या फिर्यादित म्हटले आहे.

दरम्यान, शनिवारी सकाळी छत्रपती संभाजीराजे यांनी आंतरवाली सराटी गावात जाऊन मनोज जरांगे आणि आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. यावेळी उपस्थितांच्या समोर बोलताना ते म्हणाले, हे काय सुराज्य आहे? हे तर मोगल आणि निजामाचे राज्य आहे. १२ वर्षांपूर्वी मी म्हणालो होतो, मराठ्यांवर गोळ्या घालायच्या असेल तर अगोदर माझ्यावर घाला. गोळ्या घालायला आंदोलनकर्ते काय पाकिस्तानी किंवा आतंकवादी आहेत? गुन्हे दाखल कशासाठी करता? दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्या. लाठीमार आणि गोळीबार करण्याचे आदेश देणाऱ्यांचे निलंबन झाल्याशिवाय गप्प बसणार नाही.

गृहमंत्री म्हणतात, पोलिसांची चूक नाही. मग गोळ्या झाडणे बरोबर आहे का? हे देवेंद्र फडणवीस यांनी सांगावे. लाठीमार आणि गोळीबाराची कृती अमानुषीय असून या प्रकरणी स्पष्टीकरण मिळाले पाहिजे. कशा पद्धतीने मराठा समाजास आरक्षण देता हे सांगा. माझ्यासाठी समाजकारण प्रथम आणि राजकारण दुय्यम आहे. दिल्ली आणि महाराष्ट्रात एकाच पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकार आहे. वर आणि खाली आपलेच सरकार आहे तर मग मराठा समाजास आरक्षण कधी मिळणार हे सांगा, असा सवाल छत्रपती संभाजीराजे यांनी सत्ताधाऱ्यांना उद्देशून केला.

राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी आंदोलनाच्या ठिकाणी भेट दिली. ते म्हणाले, आंदोलनकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी इतर गावांतून लोक येत होते. शांततेत चाललेले उपोषण मोडीत काढण्याचा प्रयत्न पोलिसांकडून झाला. पोलिसांच्या लाठीमारात महिला, पुरुष व लहान मुले जखमी झाले. आंदोलन करणाऱ्यांवर बळाचा वापर करणे योग्य नाही. पोलिसांनी या प्रकरणी उगीचच अंधाधुंद गुन्हे दाखल करू नयेत. प्रशासन आणि पोलिसांमुळे हे प्रकरण चिघळले आहे.

ही घटना माणुसकीला शोभणारी नाही. जालना येथे येत्या ८ सप्टेंबर रोजी राज्य शासनाचा ‘शासान आपल्या दारी’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येणार असल्याने प्रतिसाद मिळणाऱ्या या आंदोलनाचा त्यावर प्रभाव पडला असता किंवा अडचण आली असती, असेही सांगितले जात आहे. आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर झालेला बळाचा वापर खालच्या पातळीवरील पोलीस करतील, असे वाटत नाही. वरच्या संदेशाशिवाय असा निर्णय घेतला जात नाही. बळाचा वापर करण्यासाठी गृहमंत्रालयाचा आदेश आला असावा, अशी शक्यताही रोहित पवार यांनी यावेळी व्यक्त केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here