मुंबई,दि.26: मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीर राज्यातील 3 जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. जरांगे पाटील मुंबईकडे निघाले होते मात्र ते अंतरवाली सराटीत परत आले आहेत. त्यांनी मराठा समाजाला शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले.
मनोज जरांगे यांच्या दोन सहकाऱ्यांना पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतले आहे. याचा विरोध म्हणून घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे बस जाळण्यात आली आहे. मागील वेळेस मराठा आंदोलनाच्या काळात बीड आणि जालन्यामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. सुरक्षेचा उपाय म्हणून जालना, बीड आणि संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

मागील आंदोलनाच्या वेळेस जालन्यामध्ये आमदाराच्या घर पेटवून देण्यात आलं होतं. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावरही हल्ला करण्यात आला होता. अंतरवाली सराटीमध्येही मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दंगल नियंत्रण पथक जालन्यामध्ये दाखल झालं असून अंतरवाली सराटीमध्ये अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले आहेत. जालना आणि बीड जिल्ह्याच्या सीमांवर मोठ्याप्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले असून प्रत्येक गाडी तपासूनच सोडली जात आहे. कोणालाही परवानगी शिवाय या जिल्ह्यांमध्ये प्रवेश दिला जात नाहीये.
3 जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद
मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले होते. मात्र ते परत अंतरवाली सराटी येथे आले. मराठा समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना आणि बीड जिल्ह्यात संवेदनशील भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पोलिसांनी बीड आणि जालन्याच्या सीमांवर चेकपोस्ट उभारले असून सीमा सील केल्या आहेत. बीडमध्ये तब्बल 38 ठिकाणी नाकाबंदी लागू करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात 37 (1)(3) महाराष्ट्र पोलीस कायदा लागू करण्यात आला आहे. बीडमध्ये आज म्हणजेच सोमवारी (26 फेब्रवारी रोजी) दुपारी 4 वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बीड प्रमाणेच जालना आणि छत्रपती संभाजी नगरमध्येही इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. अनेक मोबाईल कंपन्यांनी ग्राहकांना प्रशासनाच्या निर्देशानुसार इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्याचे संदेश पाठवण्यात आले आहेत.