बीड,दि.31: गाढवं चोरीला गेल्याची घटना घडली आहे. तीन दिवसात 124 गाढवं चोरीला गेली आहेत. बीड जिल्ह्यातील परळी येथून गाढवं चोरीला गेली आहेत. अज्ञात चोरट्याने 25 ते 27 ऑक्टोबर दरम्यान शहरातील विविध भागातून 18 लाख 34 हजार रुपये किमतीच्या गाढवांवर डल्ला मारला आहे. संबंधित गाढवं परळी शहरात वीट भट्टीवर काम करणाऱ्या मजुरांची असून 34 मजुरांनी परळी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तीन दिवसात शहरातील 124 गाढवं चोरीला गेल्याची माहिती समोर येताच, पोलीस प्रशासन देखील खडबडून जागं झालं आहे.
चोरट्यांनी ऐन दिपावली सणाच्या तोंडावर 124 गाढवांवर डल्ला मारून आपली दिवाळी साजरी केली आहे. यामुळे आता पोलिसांनी दिवाळीच्या तोंडावर गाढवं शोधण्याची वेळ आली आहे. याबाबत माहिती देताना परळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांनी सांगितलं की, ‘परळी शहरातून गाढवं चोरीला गेल्याची तक्रार आमच्याकडे आली आहे. तक्रारीबाबत आम्ही खातरजमा करत आहोत. सदर प्रकरणात तथ्य आढळलं तर आम्ही गुन्हा दाखल करणार असून याबाबतचा तपास सुरू आहे.’
तक्रारदार मजूर अमोल बाबूशा मोरे यांच्यासह अन्य 34 मजुरांनी परळी पोलीस ठाण्यात गाढवं चोरीला गेल्याची तक्रार दिली आहे. 25 ते 27 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास परळी शहरातील मोंढा मार्केट, राणी लक्ष्मीबाई टॉवर, नाथ चित्र मंदिर आणि वैद्यनाथ मंदिर परिसरातून ही गाढवं चोरीला गेल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. चोरीला गेलेल्या 124 गाढवांची बाजारभावानुसार, 18 लाख 34 हजार रुपये एवढी किंमत आहे.