औरंगाबाद,दि.12: इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी औरंगाबादमध्ये नामकरणाच्या मुद्द्यावरुन मूक मोर्चा काढला होता. औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरुन खासदार इम्तीयाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी उद्धव ठाकरेंसह शरद पवारांवर निशाणा साधला आहे. मागे उद्धव ठाकरेंनी औरंगाबादचा विकास करणार असल्याचं सांगितलं होतं.
मात्र सत्ता सोडून जाता जाता उद्धव ठाकरेंनी हा औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला. त्याशिवाय आघाडी सरकारमधील शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद नामकरणाच्या निर्णयाबद्दल माहिती नसल्याचं सांगितलं.
शरद पवार हे खोटं बोलत असल्याचा दावा यावेळी जलील यांनी केला. शिवाय झुठ बोले..ची घोषणा दिली. आमचा संभाजी राजेंच्या नावाला विरोध नाही. मात्र आधी औरंगाबाद शहर आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनवा. त्यानंतर मी स्वतः संभाजीनगर नामकरणाचा प्रस्ताव घेऊन येईन, असंही यावेळी ते म्हणाले. आणि जर संभाजी राजेंचं नावच द्यायचं असेल तर त्या ताकदीचं शहर उभारून दाखवा, असं आव्हान जलील यांनी यावेळी दिलं.