अमरावती,दि.17: अमरावती हिंसाचार प्रकरणी सायबर सेलच्या (Cyber Cell) हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत. त्रिपुरा कथित हिंसाचार प्रकरणानंतर अमरावतीत पडसाद उमटले होते. रझा अकादमीकडून 12 नोव्हेंबर शहरात निषेध मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेला निघाला होता. या मोर्चात जवळपास 15 ते 20 हजार आंदोलक सहभागी झाले होते. मात्र, या मोर्चाला नंतर हिंसक वळण लागले होते. यावेळी आठ ते दहा दुकानांची तोडफोड झाली होती. तसेच काही दुकानदारांना मारहाण करण्यात आल्याची देखील माहिती समोर आली.
पोलिसांनी अमरावती येथे झालेल्या हिंसाचार (Amravati Violence) प्रकरणात आपला तपास सुरू करत कारवाई सुरू केली. त्यातच आता पोलिसांच्या सायबर सेलच्या (Cyber Cell) हाती महत्त्वाचे धागेदोरे लागल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणात बनावट सोशल मीडिया अकाऊंट्सचा वापर करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सायबर सेलला 36 सोशल मीडिया अकाऊंटस आढळून आली आहेत जी बनावट आहेत. ही सर्व सोशल मीडिया अकाऊंट्स त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ झालेल्या हिंसाचाराबद्दलचे फेक मेसेज तयार करुन फॉरवर्ड करण्यासाठी वापरण्यात आले. आता या संबंधित सोशल मीडिया अकाऊंट्सचे आयपी ॲड्रेस सायबर पोलीस ट्रेस करत आहेत. याच सोशल मीडिया अकाऊंट्सवरील पोस्टमुळे महाराष्ट्रात हिंसाचार झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित सोशल मीडिया युजरने त्रिपुरा हिंसाराचाबाबत चुकीची माहिती पसरवली. तसेच धर्मविरोधी आणि चिथावणीखोर संदेश प्रसारित केले. इतकेच नाही तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द सुद्धा वापरले.
आता पोलीस पथक या संबंधित सोशल मीडिया अकाऊंट्सची माहिती आयपी अँड्रेसद्वरे ट्रेस करत आहेत. हे सर्व सोशल मीडिया अकाऊंट्स हे बनावट होते.