मुंबई,दि.१४: राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नबाब मलिक (Nabab Malik) यांनी पत्रकार परिषदेत NCB च्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. ८ जानेवारी २०२१ रोजी एनसीबीनं सांगितलं की दोन पार्सल जप्त केलेत. ९ जानेवारीला करण सजलानी यांच्या घरी छापा पडला आणि एनसीबीनं प्रेस रिलीज काढून २०० किलो गांजा जप्त केल्याची माहिती दिली. त्याच दिवशी एनसीबीच्या अधिकाऱ्याच्या मोबाइल नंबरवरून (९८२०१ ११४०९) चार फोटो पत्रकारांना पाठवण्यात आलं. एका ब्रिटिश नागरिकाला पकडण्यात आल्याचं सांगण्यात आलं. देशभर या बातमीला प्रसिद्धी मिळाली. असे नबाब मलिक यांनी सांगितले.
हा मोबाइल नंबर अत्यंत महत्त्वाचा. याच मोबाइलवरून पाठवलेले फोटो रिपब्लिक टीव्ही आणि अन्य मीडियातमध्ये दाखवली गेली. त्यानंतर एका मुलीकडून साडेसात ग्रॅम गांजा पकडला गेला. शाहिस्ता फर्निचरवाला हे तिचं नाव. या मुलीला त्याच दिवशी जामीन मिळाला असल्याचे नबाब मलिक यांनी सांगितले.
पुढे बोलताना नबाब मलिक म्हणाले, ९ जानेवारी रोजी दिल्ली, गुरगाव, नोएडा, बेंगळुरू, मुच्छड पानवाला आणि माझा जावई समीर खान यांच्या घरी व कानपूर इथं छापे टाकले गेले. एनसीबीच्या हवाल्यानं ह्या सगळ्या बातम्या प्रसिद्ध झाल्या.
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 14, 2021
१३ तारखेला सकाळी माझ्या जावयाला एनसीबीनं समन्स पाठवलंय का अशी विचारणा पत्रकारांकडून झाली. मी त्यात तथ्य नसल्याचं सांगितलं. १३ तारखेला समन्स आलं. समीर खान गेले. तिथं पत्रकार आधीच उपस्थित होते. सगळीकडं बातम्या दिल्या गेल्या असे नबाब मलिक म्हणाले.
समीर खान ड्रग्ज तस्कर आहे. मोठं रॅकेट चालवतो असं पसरवलं गेलं. आम्ही आमच्या पद्धतीनं कायदेशीर कारवाई सुरू केली. सहा महिन्यांनी सुनावणी सुरू झाली. तेव्हा एनसीबीनं आरोपपत्र दाखल करण्याची तयारी दाखवली असे मलिक म्हणाले.
नंतर प्रकरण कनिष्ठ कोर्टात गेलं. तिथं आरोपपत्र दाखल करण्यासाठी एनसीबीनं साडेतीन महिने लावले. शक्य होईल तेवढा वेळ काढण्याचा प्रयत्न एनसीबीनं केला. पण शेवटी जामीन मिळाला असे नबाब मलिक यांनी सांगितले.
२०० किलो गांजा मिळाल्याचं एनसीबीचं म्हणणं होतं. पण ते खोटं होतं. केवळ साडेसात ग्रॅम गांजा शाहिस्ता फर्निचरवालाकडं मिळाला होता असे नबाब मलिक यांनी सांगितले.
तपास यंत्रणांकडं इन्स्टंट तपासणीसाठी किट असतं. त्याचा वापरही केला गेला. पण तरीही खोटी केस बनवण्यात आली. खरं प्रकरण शाहिस्त फर्निचरवालाचं होतं, पण तिला जामीन दिला गेला असे मलिक म्हणाले.
रिया चक्रवर्ती प्रकरणातील एका आरोपीला शाहिस्ता प्रकरणात गोवण्यात आलं. सगळं काही ठरवून केलं गेलं. हा कोर्टाचा रिपोर्ट आहे, माझं म्हणणं नाही. एनसीबी बनावट कारवाया करते हा माझा आरोप होता आणि आजही आहे, असेही मलिक म्हणाले.
अंमली पदार्थ जिथं जप्त केले, ती जागा म्हणजे एनसीबीचं कार्यालय होतं. समीर खान किंवा करण सजलानीचं घर नव्हतं. एनसीबीनं मोबाइलवर पाठवण्यात आलेल्या फोटोत ते दिसत असल्याचे मलिक यांनी सांगितले.
आपल्याला हव्या त्या बातम्या पसरवल्या जातात. पण जबाबदारी घ्यायची वेळ आली की मीडियावर ढकललं जातं. भाजपचे सर्व नेते व मीडिया नवाब मलिक यांच्या जावयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते. पण समीर खान, राहिला फर्निचरवाला, करण सजलानी यांना चुकीच्या पद्धतीनं गोवलं गेलं होतं हे कोर्टाच्या आदेशातून स्पष्ट झाल्याचे मलिक यांनी सांगितले.
माझी मुलगी, माझ्या कुटुंबाची जी बदनामी झालीय, त्याविषयी आम्ही न्यायालयात जाणारच आहोत. पण, कोणी कितीही बातम्या पेरल्या तरी पत्रकारांनी त्याची सत्यता तपासावी, अशी विनंती नबाब मलिक यांनी केली.
एनसीबीच्या विरोधात पत्रकार परिषद घेतल्यापासून मला धमक्या येत आहेत. धमक्यांच्या पार्श्वभूमीवर माझी पोलीस सुरक्षा वाढवण्यात आलीय असे मलिक यांनी सांगितले.