दि.12: राज्यसभा निवडणूकीत कोल्हापूरचेच असलेले संजय पवार (Sanjay Pawar) यांचा पराभव झाल्याचे मला दुःख आहे असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी मोठी चुरस निर्माण झाली होती. अटीतटीच्या लढतीत भाजपाने विजय मिळवला. निवडणूकीत भाजपाचे धनंजय महाडिक यांनी शिवसेनेचे संजय पवार यांचा पराभव केला. विजयी उमेदवार धनंजय महाडिक यांनीही संजय पवार हे चांगले मित्र आहेत असे म्हटले होते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
पक्षनिष्ठेसमोर मी बायकोचेही ऐकत नसतो. उद्या तिने अमुक माझा भाऊ आहे, असे सांगितले अन् ते पक्षहिताच्या आड येणार असेल, तर मी त्याला मदत करणार नाही, असे सांगतानाच फटके खाल्ल्याशिवाय शिवसेनेला शहाणपण येणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
चंद्रकांत पाटील म्हणाले, कोल्हापूरचेच असलेले संजय पवार यांचा पराभव झाल्याचे मला दु:ख आहे. ते आमच्या जवळचे आहेत; पण माझ्यासाठी पक्षहित महत्त्वाचे आहे आणि पक्षनिष्ठेसमोर मी बायकोचेही ऐकत नसतो. विशेष म्हणजे, धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीचा आग्रह पाटील यांनी धरला होता.
शरद पवार यांनीही फडणवीस यांना या विजयाचे श्रेय दिले हे चांगले झाले. फडणवीस हे तेल लावलेले पैलवान आहेत. कुणाच्या हातात सापडत नाहीत. त्यांनी शिवसेनेचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला. आता आम्ही विधान परिषदेच्या सहा जागा जिंकू, असेही ते म्हणाले.