मुंबईसह या जिल्ह्यांना पुढचे 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा

0

मुंबई,दि.17: हवामान खात्याने मुंबईसह इतर जिल्ह्यांना पुढचे 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. परतीच्या पावसाने राज्यात जोरदार हजेरी लावली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पाऊस आणखी काही दिवस थैमान घालण्याची शक्यता आहे. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आलेली असताना राज्यात अजूनही पावसाचा जोर मात्र कायम आहे. त्यामुळे, यंदाची दिवाळीही पावसातच जाणार असल्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज आणि उद्या (मंगळवारी) मुंबईमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

दिवाळी काही दिवसांवर आल्याने नागरिक खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. मात्र, पाऊस खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्यांचा हिरमोड करण्याची शक्यता आहे. आज आणि उद्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मुंबईसह ठाणे जिल्ह्यातही पुढील दोन दिवस पावसाची शक्यता आहे. तर पालघर जिल्ह्यात आज मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, परभणी, जालना या जिल्ह्यांमध्येही मंगळवारपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय औरंगाबाद, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये बुधवारपर्यंत मेघगर्जनेसह पाऊस बरसण्याची शक्यता आहे.

मागच्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने राज्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह पुणे आणि मुंबईतही अतिवृष्टीसारखा पाऊस झाला. दरम्यान उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेशातून मान्सूनने परतीचा प्रवास केला आहे. याचबरोबर राज्यातील काही भागांतून मान्सूनने माघार घेतली आहे. पुढील 1-2 दिवसांत महाराष्ट्राच्या आणखी भागांतून मान्सून माघारची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here