नागपूर,दि.29: Heat wave in Maharashtra: महाराष्ट्रातील अनेक शहरात तापमानात वाढ होत आहे. सोलापूरचे (Solapur) आजचे तापमान 42.1 अंश सेल्सिअस होते. सोलापूरातील तापमानात पुढील दिवसात वाढ होण्याची शक्यता आहे. आजपासून पुढील पाच दिवस राज्यातील विविध भागात कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात मराठवाड्यासह विदर्भातील काही शहरांचे तापमान 43 ते 44 अंशापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. सासत्याने तापमानात होणारी वाढ पाहता सूर्याचा UV इंडेक्स धोकादायक पातळीवर पोहोचण्याची शक्यता आहे. UV इंडेक्स अर्थातच अतिनील किरणांची पातळी 11 पेक्षा अधिक जोखमीच्या पातळीवर असणार आहे.
त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर पडण्याचं टाळावं. तसेच दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्यावं असा सल्ला हवामान विभागाच्या तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. अतिनील किरणांमुळे उष्माघात होऊ शकतो. त्यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सकाळी दहा ते दुपारी चारच्या दरम्यान वातावरणात अतिनील किरणे अतितीव्र असतात. त्यामुळे दरम्यानच्या काळात बाहेर जाणं टाळावं. ही अतिनील किरणे मानवी शरीरासाठी अत्यंत जोखमीचे असू शकतात.
हवामान खात्याने आज अहमदनगर, बुलडाणा, अकोला आणि नागपूर या चार जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. आज येथील कमाल तापमानाची तीव्रता अधिक राहणार असून उष्णतेची लाट (heat wave) येणार आहे. सकाळपासूनच याठिकाणी नागरिकांना प्रचंड उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. उर्वरित महाराष्ट्रात आज कोरडं हवामान राहणार असून वातावरणात उन्हाच्या ज्वाळा अधिक असणार आहे. उद्यापासून महाराष्ट्रात आणखी दाहकता वाढणार आहे.
उद्या जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि नागपूर या अकरा जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. संबंधित ठिकाणी हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला असून येथील कमाल तापमान 43 ते 44 अंशापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. अगदी फेब्रुवारीपर्यंत राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडल्यानंतर अचानक उष्णतेत वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. पुढील पाच दिवस मराठवाड्यासह, विदर्भ, लगतचा उत्तर महाराष्ट्र परिसरात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
Home महाराष्ट्र Heat wave in Maharashtra: महाराष्ट्रात पुढील 5 दिवस उष्णतेची लाट; हवामान खात्याने...