मुंबई,दि .9: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानासमोर एसटी कर्मचाऱ्यांनी काल (दि.9) अचानक आंदोलन करत चप्पल फेक व दगडफेक केली. शरद पवार यांच्या घरावर हल्ला प्रकरणी गावदेवी पोलिसांनी अॅड गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली आहे. माझी हत्या होऊ शकते, त्यासाठी वळसे पाटील जबाबदार असतील, असं वक्तव्य काल सदावर्तेंनी केलं होतं. कोणतीही नोटीस न देता घरातून नेलं असा त्यांचा आरोप आहे. दरम्यान त्यांची मध्यरात्री तब्बल 4 तास मेडिकल तपासणी करण्यात आली. दरम्यान का शरद पवारांच्या घरावर हल्ला करणारे 103 आंदोलक पोलिसांच्या ताब्यात आहेत.
खासदार शरद पवार यांच्या घरावर हल्ला प्रकरणी गावदेवी पोलिसांनी अॅड गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली. त्यांना रात्री अकरा वाजता वैद्यकीय तपासणीसाठी आधी नायर आणि मग जेजे रुग्णालयात नेण्यात आले. सुमारे चार तास त्यांची मेडिकल जेजे मध्ये करण्यात आली. पोलिसांनी त्यांना रात्रभर माध्यमांसमोर येण्यापासूनचा रोखण्याचा प्रयत्न केला. यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी मात्र संताप व्यक्त केला आहे. आज सदावर्ते यांना अकरा वाजताच्या दरम्यान न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी दिली आहे. शरद पवार डर्टी पॉलिटिक्स करतात असा आरोप जयश्री पाटील यांनी केला असून गुणरत्न सदावर्तेंची अटक बेकायदेशीर असा दावाही त्यांनी केला आहे.
जीवाला धोका- सदावर्ते
काल सदावर्ते यांनी म्हटलं होतं की, कोणतीही नोटीस न देता मला ताब्यात घेतलं आहे, व्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आहे. मला ताब्यात घेताना कोणत्याही प्रक्रियेचे पालन करण्यात आलं नाही. माझ्या जीवाला काही धोका निर्माण झाला तर त्याला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील जबाबदार असतील असंही ते म्हणाले. कष्ट करी हे कधीही कुणावर हल्ला करत नाहीत. हल्ला केला असं शरद पवारांनीही कुठेही म्हटलं नाही. मलाही कुठेही तसं कोणी हल्ला केल्याचं दिसलं नाही. त्यामुळे या कष्टकऱ्यांना बदनाम करू नका. हंगामा कुणी केला याची लाय डिटेक्टर चाचणी करा अशी मागणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी काल केली होती.
दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनानंतर आता तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मध्यरात्री आझाद मैदानात बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी बाहेर काढले आहे. आता या आंदोलकांनी सीएसएमटी रेल्वे स्थानकात ठिय्या दिला आहे. आम्हाला पोलिसांनी मध्यरात्री लाठीचार्ज करून बाहेर काढले. आमच्यावर अन्याय करण्यात आला आहे. बाहेरचे पोलीस आम्हाला रेल्वे स्थानकाबाहेर येऊ देत नाहीत आणि रेल्वे स्थानकातून ही पोलीस जा सांगत आहेत. यामुळे आता आम्ही काय करणार आम्ही इथेच बसून राहू असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.