औरंगाबाद,दि.19: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वक्तव्य केलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबाबतच्या केलेल्या एका विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. ‘शिवाजी महाराज तर जुने युगाचे हिरो, डॉ. आंबेडकरांपासून तर डॉ. गडकरीपर्यंत नवीन युगाचे हिरो असल्याचे कोश्यारी म्हणाले आहे.
औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 62 वा दीक्षान्त समारंभ आज पार पडला, यावेळी बोलतांना कोश्यारी यांनी हे विधान केले आहे. तर त्यांच्या याच विधानाला आता विरोध होतांना देखील पाहायला मिळत आहे.
यावेळी बोलतांना राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, आम्ही शाळेत असताना आम्हाला शिक्षक विचारत होते की, तुमचा आवडता हिरो कोण आहे. त्यामुळे कोणाला सुभाषचंद्र भोस, कोणाला महात्मा गांधी, पंडीत जवाहरलाल नेहरू आवडायचे. त्यामुळे मला असे वाटते की, तुम्हाला जर कोणी विचारले तुमचे आवडत हिरो कोण आहे. तर तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही. कारण तुम्हाला महाराष्ट्रातचं ते सापडून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या युगाची गोष्ट आहे, मी नवीन युगाची गोष्ट सांगतोय असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले. डॉ. आंबेडकरांपासून तर डॉ. नितीन गडकरीपर्यंत तुम्हाला इथेच भेटून जातील असेही कोश्यारी म्हणाले.
मराठवाडा विद्यापीठात दीक्षान्त समारंभ
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 62 वा दीक्षान्त समारंभ आज पार पडला. विद्यापीठाच्या नाट्यगृहात हा समारंभ झाला असून, ‘सुपर कॉम्प्युटर’ चे जनक विजय भटकर (कुलपती, नालंदा विद्यापीठ) यांच्या प्रमुख उपस्थितीत व राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभात माजी मुख्यमंत्री, शरद पवार व केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना डी. लिट. प्रदान करण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा आयोजित करण्यात आलेल्या दीक्षान्त समारंभात 433 संशोधक विद्यार्थ्यांना यांना पीएच. डी. प्रदान करण्यात आले. यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा 146, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र 48, मानव्य विद्या 163 व तर आंतरविद्या शाखांतील 76 संशोधक विद्यार्थ्यांचा समावेश आहे.