राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्या विधानाबद्दल मागितली माफी

0

मुंबई,दि.1: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई तसेच महाराष्ट्राविषयी बोलताना वादग्रस्त विधान केल्यामळे राज्यात संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. कोश्यारी यांना राज्यपालपदावरून दूर करावे तसेच त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी केली जात होती.

मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास मुंबई ही आर्थिक राजधानी राहणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले होते.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज एक पत्रक प्रसिद्ध करत माफी मागितली आहे. महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करून आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देईल असा विश्वास बाळगतो, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या माफी मागताना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

याबाबत प्रसिद्ध केलेल्या निवेदनात राज्यपाल म्हणाले की, दिनांक २९ जुलै रोजी अंधेरी येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात मुंबईच्या विकासात देशातील काही समाज बांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडून कदाचित काही चूक झाली. महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाच्या विकासात सर्वांचेच उल्लेखनीय असे योगदान आहे.  विशेषतः संबंधित राज्याची सर्वसमावेशकता व सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची आपली उज्ज्वल परंपरा यामुळेच आज आपला देश प्रगती पथावर अग्रेसर होत आहे. गेल्या जवळपास तीन वर्षांत मला राज्यातील जनतेचे अपार प्रेम मिळाले आहे. आपल्या वतीने मी महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा गौरव वाढवण्याचा कसोशीने प्रयत्न केला.

परंतु,  त्या दिवशीच्या भाषणात माझ्याकडून निर्हेतुकपणे काही चूक झाली असेल तर त्या चुकीला या थोर महाराष्ट्र राज्याचा अवमान समजला जाईल ही कल्पना देखील मला करवत नाही. महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करून आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देईल असा विश्वास बाळगतो, असे भगतसिंह कोश्यारी म्हणाले. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here