सोलापूर- आज दि. 18 ऑक्टोबर 2022 रोजी अभियांत्रिकी पदवी प्रवेशाची पहिल्या फेरीची यादी जाहीर झाली आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी पुढील गोष्टी काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे. ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळाले आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन रु. 1000/- भरून सीट ॲक्सेप्टन्स करणे गरजेचे आहे.
ज्या विद्यार्थ्यांना प्रथम ऑप्शन अलॉट झाले आहे, अशा विद्यार्थ्यांची जागा ऑटो फ्रिज होते व त्यांनी सीट ॲक्सप्ट करुन मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक असते. ज्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंती क्रमांकांपासून पुढचे महाविद्यालय अलॉट झाले आहे आणि जर विद्यार्थी त्या महाविद्यालयास प्रवेश घेण्यास इच्छुक असतील त्यांनी फ्रीज ऑप्शन सिलेक्ट करून मिळालेली सीट रु. 1000 भरून ॲक्सेप्ट करावी व त्या महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करावा. जर आपल्याला मिळालेल्या पसंती क्रमांकाच्या वरच्या पर्यायाचे महाविद्यालय हवे असेल तर विद्यार्थ्यांनी नॉट फ्रिज करून हजार रुपये भरून सीट ॲक्सेप्ट करावी व दुसऱ्या फेरीत सहभागी व्हावे.
ज्या विद्यार्थ्यांनी नेट कॅफेमध्ये किंवा इतर कोणाशी आपला पासवर्ड शेअर केला असेल तर त्यांनी तो त्वरित बदलून घ्यावा जेणेकरून विद्यार्थ्यांची फसवणूक होणार नाही. दुसऱ्या व तिसऱ्या फेरीसाठी सर्व प्रोसेस पहिल्या फेरीप्रमाणेच असेल फक्त तिसऱ्या फेरीमध्ये राहिलेल्या सर्व जागा खुल्या होतात. ज्या विद्यार्थ्यांना सीएसई (CSE) अलॉटमेंट आपल्या पसंतीच्या महाविद्यालयात मिळालेली नाही अशा विद्यार्थ्यांनी दुसऱ्या फेरीमध्ये आपल्या पसंतीच्या महाविद्यालयात इलेक्ट्रीकल, सिव्हील आणि मेकॅनिकल ब्रँचसाठी प्रयत्न करावा, कारण या ब्रँचमधून सुध्दा सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये जॉब मिळू शकतो, त्याचबरोबर येणाऱ्या काळात बेसिक ब्रँचेसचे महत्व नक्कीच वाढणार आहे.
ज्या विद्यार्थ्याचे रजिस्ट्रेशन झालेले नाही अशा विद्यार्थ्यांनी अगेंस्ट कॅपसाठी रजिस्ट्रशन व कर्न्फमेशन करावे. जर प्रवेशासंदर्भात काही शंका व अडचणी असतील अशा विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन ऑर्किड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. दफेदार यांनी केलेले आहे.
दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी घ्यावयाची काळजी
1) प्रथम फेरीत मिळालेले महाविद्यालय अथवा शाखा पसंत नसेल तर सदर विद्यार्थी दुसऱ्या फेरीमध्ये पुन्हा नव्याने ऑप्शन भरू शकतो किंवा ऑप्शन फॉर्म तसाच ठेवू शकतो.
2) प्रथम फेरीमध्ये मिळालेले महाविद्यालय दुसऱ्या फेरीमध्ये शेवटचे पसंती क्रम असते.
3) सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे दुसऱ्या फेरीमध्ये जर विद्यार्थ्याला आणखी वरच्या क्रमांकाचा पसंती क्रम मिळाला तर पहिल्या फेरीतील पसंती क्रमावरील विद्यार्थ्यांचा हक्क निघून जातो, यामुळे विद्यार्थ्यांनी दुसऱ्या व तिसऱ्या फेरीत ऑप्शन टाकताना आपल्याला मिळालेला ऑप्शनपेक्षा चांगला असेल तरच टाकावे.
4) पहिल्या फेरीत सहभागी न होऊ शकलेले विद्यार्थी सुध्दा दुसऱ्या फेरीत सहभागी होऊ शकतात.