वर्धा,दि.8: एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात 40 प्रवासी जखमी झाले आहेत. वर्ध्यात एसटी महामंडळाची बस उलटली आहे. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अपघातानंतर बघ्यांची मोठी गर्दी परिसरात जमली आहे. तर काही स्थानिकांनी तातडीने बसमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची संख्या जास्त आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, वर्ध्याच्या आष्टीच्या तेलाई घाटात एसटी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात 40 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. यापैकी पाच जणांची प्रकृती गंभी असल्याचे सांगण्यात येत आहे.
यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने सर्व प्रवाशांना बसमधून काढण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु केले. तसेच तातडीने रुग्णावाहिका घटनास्थळाच्या दिशेला रवाना करण्यात आल्या. जखमींवर तातडीने उपचार व्हावेत या हेतूने तातडीने रुग्ण रुग्णालयाच्या दिशेला रवाना करण्यात आले. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्याच्या वरुड येथून ही बस (क्र. MH 40 Y 5103) तळेगावला येत होती. यावेळी तेलाई घाटात भरधाव बस उलटून हा भीषण अपघात झाला. यामध्ये बसमधील 40 प्रवासी जखमी झाले. बसच्या महिला चालकाकडून दुचाकीला वाचवण्याच्या नादात हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.