सोलापूर,दि.१५: महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका करिता आज मतदान होत आहे. मात्र मुंबई, ठाणे, नागपूर, सोलापूरसह अनेक शहरांमध्ये ईव्हीएम मशीन बिघडल्याने मतदारांना त्रास सहन करावा लागत आहे. मतदान सुरु झाल्यानंतर अनेक शहरांमधील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड असल्याचं दिसून येत आहे. पुणे, नागपूर, चंद्रपूर, ठाणे, नागपूर, मुंबई, नाशिकसारख्या अनेक शहरामंध्ये ईव्हीएम बंद पडल्याने सकाळीच मतदानासाठी आलेल्या नागरिकांना खोळंबून रहावं लागलं.
सकाळी ७:३० वाजल्यापासून मतदार केंद्रांवर मतदार मतदान करण्यासाठी रांगा लावून उत्स्फूर्त प्रतिसाद देत असतानाच अनेक शहरांमध्ये ईव्हीएममशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. २९ महानगरपालिकांच्या एकूण २,८६९ जागांसाठी आज मतदान होत आहे.
अनेक शहरामंध्ये ईव्हीएम बंद पडल्याने सकाळीच मतदानासाठी आलेल्या नागरिकांना खोळंबून रहावं लागलं. एकीकडे ईव्हीएमसंदर्भात राज्यभरातून तक्रारी नोंदवल्या जात असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये एक अत्यंत विचित्र प्रकार घडल्याचं पाहायला मिळालं.
ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मध्ये सेंट झेवियर्स या शाळेत रूम नंबर १० आणि १२ या ठिकाणी मशीन मध्ये तांत्रिक बिघाड झाला होता त्यामुळे मतदानासाठी आलेल्या मतदारांना काही वेळ तात्काळत उभे राहावं लागले. रूम नंबर १० येथील मशीन मध्ये बिघाड होता तर रूम नंबर १२ मध्ये मशीनला करंट (शॉक) लागत होता, त्यामुळे हे बिघड दुरुस्त करण्यासाठी सुमारे अर्धा तासाचा कालावधी गेला. त्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली.
काँग्रेस उमेदवार राहुल शर्मा यांनी सोलापूरच्या प्रभाग २४ मधील संगमेश्वर महाविद्यालय केंद्रावर यंत्र बंद पडल्यावर संताप व्यक्त केला. त्यांच्या मते, यंत्र बंद पडल्यानंतर ते दुरुस्त करण्यासाठी साधे तंत्रज्ञही वेळेवर उपलब्ध नव्हते, ज्यामुळे प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
नांदेडच्या महात्मा फुले हायस्कूलमधील केंद्र क्र. १२ वर अर्ध्या तासापासून यंत्र बंद असल्याने रांगा वाढल्या होत्या. तर धुळ्यातील प्रभाग ४, ५, १० आणि ११ सह देवपूरपरिसरातील उर्दू हायस्कूलमध्ये २० मिनिटे तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. तसेच अमरावती गर्ल्स हायस्कूल केंद्र २३ येथे सकाळी ७:३० पासूनच यंत्रात बिघाड झाल्याने मतदानाची सुरुवातच उशिरा झाली.








