नवी दिल्ली,दि.18: केरळमध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये (EVM) अनियमितता आणि इतरांची मते भाजपला हस्तांतरित केल्याच्या आरोपावरून सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला या तक्रारींची दखल घेण्यास सांगितले आहे.
केरळमधील कासारगोडमध्ये झालेल्या मॉक पोलिंगमध्ये प्रत्येक मत भाजपलाच जात असल्याचा आरोप अर्जामध्ये करण्यात आला होता. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी आयोगाच्या वकिलांना याची दखल घेण्यास सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने आज निवडणूक आयोगाला डेमो दरम्यान केरळमध्ये कासरगोड लोकसभा मतदारसंघात भाजपला 1 अधिक मतदान झाल्याच्या प्रकरणावर उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयात व्हीव्हीपॅटमधील मतदानाची 100 टक्के मोजणी केली जावी या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. त्या दरम्यान याचिकाकर्त्यांचे वकील प्रशांत भूषण यांनी या घटनेचा उल्लेख केला.
केरळमधील स्थानिक वृत्तपत्राच्या बातमीचा दाखल देत याचिकाकर्त्यांच्या वतीने युक्तीवाद करताना ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण म्हणाले लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर इव्हीएम मशीनच्या डेमो दरम्यान 4 इव्हीएम मशीनमध्ये भाजपला मत गेल्याचा दावा एलडीएफ आणि युडीएफच्या उमेदवाराने केला आहे. तसंच रिटर्नींग ऑफिसरकडे या संदर्भात तक्रार देखील केली आहे.